कनिष्ठ अभियंता पदाच्या १५० जागांसाठी लवकरच भरती प्रक्रिया जाहीर करण्यात येईल. साधारण जुलैअखेर यासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल. या भरतीच्या वेळी समाविष्ट गावे आणि थेट कार्यकारी अभियंता या पदावर भरतीसाठी आकृतीबंधात बदल करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागण्यात येणार असल्याचेही विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच्या परवानगीनंतर लगेचच भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. या भरतीत कनिष्ठ अभियंता वर्गाची १५० आणि कार्यकारी अभियंता पदाच्या नऊ ते १० पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
थेट कार्यकारी अभियंता भरती
महापालिकेत नवी गावे समाविष्ट झाल्याने ग्रामपंचायतींचे काही कर्मचारी महापालिकेकडे वर्ग झाले आहेत; परंतु त्यामुळे महापालिकेच्या आकृतीबंधात बदल करून अभियंत्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. यासोबतच महापालिकेकडे नगर अभियंता पद; तसेच अधीक्षक अभियंता पदापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेले उमेदवार, त्यांचा सेवेतील उर्वरित कार्यकाल लक्षात घेऊन भविष्यात अनेक वरिष्ठ पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे. यासाठी थेट कार्यकारी अभियंत्यांची भरती करण्यासाठी आकृतीबंधात बदल करावे लागतील. या संदर्भातील पदसंख्या आणि आवश्यक बदलांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.