हायलाइट्स:
- ‘कौन बनेगा करोडपतीमध्ये तुम्ही ४० लाख जिंकले’
- फोन आला आणि खात्यातून ८ लाख ७६ हजार गायब
- फोन आल्यानंतर जे घडलं ते वाचून हादराल
रत्नागिरी : पैसे लुटण्यासाठी हल्ली हॅकर काय ट्रिक वापरतील याचा भरोसा नाही. पण असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरीच्या खेडमध्ये समोर आला आहे. खेड तालुक्यातील कोंडीवली येथील महिलेला तुम्ही ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात ४० लाख रूपये जिंकले आहे असा फोन आला. यानंतर जे घडलं त्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही.
‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात ४० लाख रूपये जिंकले आहे. पण यासाठी तुम्हाला टॅक्स भरावा लागेल असं सांगून महिलेकडून तब्बल ८ लाख ७६ हजार ५०० रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आकाश वर्मा नामक व्यक्तीवर खेड येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना १५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत घडली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे करीत आहेत. या प्रकरणी सईद जमालऊद्दीन कामाला राहणार कोंडीवली. ता खेड यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना कोंडीवली गावात घडली.
फिर्यादी यांना ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात ४० लाख रूपयाची लॉटरी लागली आहे असा फोन आला. या मोबदल्यात ८ लाख ७६ हजार ७५० रुपये टॅक्सची भरणा करावी लागेल असे त्यांच्या मोबाईलवर सांगण्यात आले. त्याच्याकडून त्यांचा इस्लामी बॅक दुबईच्या बँकेच्या चेकचा, आधार कार्डचा व अन्य कागदपत्रांचा फोटो घेऊन फसवणूक केली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.