हायलाइट्स:
- रावसाहेब दानवे यांची जन आशीर्वाद यात्रा जालन्यात
- दानवेंनी सांगितलं निवडणुकीतील यशाचं गुपित
- अनिल देशमुख, खोतकर, लोणीकर यांना हाणले टोले
जालना: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार भाजपच्या मंत्र्यांनी देशभरात जन आशीर्वाद यात्रा सुरू केल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये लोकांशी संवाद साधत आहेत. आपल्या ग्रामीण शैलीतील भाषणांनी दानवे धम्माल उडवत आहेत. जालन्यात बोलताना त्यांनी आज आपल्या राजकीय यशाचं गुपित उघड केलं. (Raosaheb Danve in Jan Ashirwad Yatra)
भाजपची जन आशीर्वाद यात्रा जालन्यात आल्यानंतर रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांचा जिल्हा भाजपच्या वतीनं सत्कार करण्यात आला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘राजकीय नेते लोकांमधून निवडून आल्यानंतर बदलतात. मात्र, मी सतत लोकांमध्ये राहतो आणि त्यांच्यासारखं वागतो. त्यामुळंच गेल्या ४० वर्षांत एकदाही मी निवडणूक हरलो नाही,’ असं दानवे यांनी सांगितलं.
वाचा: अडवण्याची भाषा करणारे गोमूत्रवर आले…; राणे बंधूंची शिवसेनेवर टीका
‘निवडून आल्यानंतर अनेक नेत्यांच्या वागणुकीत आणि राहणीमानात बदल होतो. अनिल देशमुख यांनी शुक्लकाष्ठ मागे लागू नये म्हणून कुणाच्या तरी सांगण्यावरून हातात हिरा, पन्ना आणि निलम या अंगठ्या घातल्या, पण तरीही त्यांच्या मागे शुक्लकाष्ठ लागलं,’ अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
‘२०१९ च्या निवडणुकीत मी साडेतीन लाख मतांनी निवडून आलो. निकालाच्या दिवशी विजयाचं प्रमाणपत्र घेण्याआधी बबनराव लोणीकर आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी कसे चिमटे काढले, याचा किस्साही त्यांनी सांगितला. आयुष्यात अशा कहाण्या खूप झाल्यात असं सांगत, त्यांनी खोतकर व लोणीकर यांना टोले हाणले.
‘माझा हनिमून झालाय, कराडांची मांडव परतणी सुरू आहे’
‘भागवत कराड मंत्रिमंडळात नवीन चेहरा असल्यानं त्यांच्या मांडव परतणीचा कार्यक्रम सुरू आहे. मी तिसऱ्यांदा मंत्री झालोय. माझा हनिमून आधीच झाला आहे. त्यामुळं मला शपथ घेण्याची गरज पडली नाही,’ असं दानवे यांनी सांगताच हास्यकल्लोळ उडाला.
वाचा: LIVE ‘ज्यांना गोमूत्र शिंपडायचं त्यांना शिंपडू द्या, प्यायचं त्यांना पिऊ द्या’