हायलाइट्स:
- मुख्यमंत्री ठाकरे करोनाच्या तिसऱ्या लाटेवर परत बोलले.
- करोनावर सध्या तरी लस ही ढाल म्हणून काम करतेय.
- तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय.
नागपूर: करोना संसर्गावर सध्या प्रभावी औषध नसल्यामुळे लस ही ढाल म्हणून काम करीत आहे. येत्या काळात करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. करोनावर मात करण्यासाठी आणि तिसरी लाट रोखण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. करोनाशी लढा देण्यासाठी व कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज आहोत, असेही ते म्हणाले. ( Uddhav Thackeray On Coronavirus Third Wave )
वाचा: १२ वर्षांवरील मुलांसाठी करोनावरील लसीला केंद्राची मंजुरी
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रांगणात विदर्भ सहायता सोसायटी आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना जीवनरथ म्हणून दोनशे लसीकरण वाहनांचे हस्तांतरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दृकश्राव्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. करोना सोबतच अतिवृष्टी व पुरासारख्या संकटाचा सामना करताना जनतेच्या संरक्षणाला सरकारने प्राधान्य दिल्याचे सांगताना, राज्यात ५ कोटीपेक्षा जास्त नागरिकांना कोविड वरील लस देण्यात आली आहे. एका दिवशी ९ लाखांपेक्षा जास्त डोस देण्याची कामगिरी आपल्या आरोग्य यंत्रणेने केली असून केंद्र शासनातर्फे जेवढे जास्त डोस उपलब्ध होतील त्यानुसार लसीकरणाचा वेग वाढवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. लसीकरण केंद्रांपर्यंत पोहचू शकत नाहीत, अशा नागरिकांचे घरी जावून लसीकरण करण्यासाठी ही दोनशे लसीकरण वाहने उपयुक्त ठरणार आहेत, असे सांगतानाच जास्तीत जास्त लोकांच्या लसीकरणासाठी संपूर्ण मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वाचा: करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत CM ठाकरेंचा गंभीर इशारा; भाजपला सुनावले
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी तिसऱ्या लाटेच्यासंदर्भात लसीकरण महत्त्वाचे असून जनतेला या महामारीपासून दूर ठेवण्यासाठी दोनशे लसीकरण वाहने उपलब्ध केल्याबद्दल विदर्भ सहायता सोसायटी व महापारेषणचे विशेष अभिनंदन केले. आगामी काळातील सण व उत्सव साजरे करताना कोविडचा प्रोटोकॉल तंतोतंत पाळला जाईल याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. लसीकरण वाहनांचे हस्तांतरण व मोहिमेचा शुभारंभ करताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सद्भावना जीवनरथाच्या माध्यमातून विदर्भातील शेवटच्या घटकापर्यंत लस पोहोचण्यासाठी ही वाहने महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. संत गाडगे महाराजांचा संदेश अंमलात आणून मेळघाट, गडचिरोली यासारख्या अतिदूर्गम भागात पोहोचून लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे. यावेळी व्यासपीठावर राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर आदी उपस्थित होते.
वाचा: ठाकरे सरकारचा नारायण राणेंना दणका; जन आशीर्वाद यात्रेवर मोठी कारवाई