Morcha in Sangli: राजू शेट्टी आक्रमक; ‘या’साठी मंत्री जयंत पाटील यांच्या गावात काढणार आक्रोश मोर्चा

हायलाइट्स:

  • राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना वेळेत मदत मिळत नसल्याने माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक.
  • पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी ते मंगळवारी इस्लामपूर तहसीलदार कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार आहेत.
  • सरकारला वेळेत मदतीची अंमलबजावणी करावी लागेल. अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील- राजू शेट्टी यांचा इशारा.

म. टा. प्रतिनिधी, सांगली

राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना वेळेत मदत मिळत नसल्याने माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक बनले आहेत. पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी ते मंगळवारी इस्लामपूर तहसीलदार कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार आहेत. केवळ घोषणाबाजी करणाऱ्या सरकारला वेळेत मदतीची अंमलबजावणी करावी लागेल. अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील घटक असूनही त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारची कोंडी वाढणार आहे. (raju shetty will take out a morcha in sangli to help the flood victims in time)

जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांपासून ते विरोधी पक्षनेत्यांपर्यंत अनेकांनी पूर पट्ट्यात पाहणी दौरे केले. पूरबाधित क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला तातडीची मदत म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये, तसेच व्यवसायिकांना नुकसान भरपाईपोटी 50 हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. प्रत्यक्षात मात्र अपवाद वगळता बहुतांश पूरग्रस्तांना अजूनही मदत मिळालेली नाही. अनेक ठिकाणी अद्याप नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. शेतीची नुकसान भरपाई कशा पद्धतीने दिली जाईल याबाबत अद्याप सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाही. यामुळे पूर पट्ट्यात सरकारच्या विरोधात असंतोष वाढत आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधील घटक असलेले माजी खासदार राजू शेट्टी पूरबाधितांच्या असंतोषाचे नेतृत्व करीत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईत आज २८१ करोना रुग्ण बरे होऊन गेले घरी; पाहा, अशी आहे ताजी स्थिती!

पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी या मागणीसाठी मंगळवारी इस्लामपूर तहसीलदार कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री शिवाजीराव नाईक, तसेच इस्लामपूर नगरपालिकेचे भाजपचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील उपस्थित होते. मोर्चात सर्व पक्ष सहभागी होणार असल्याचा दावा शेट्टी यांनी केला आहे. मात्र एकीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये घटक पक्ष असनाही दुसरीकडे सरकारच्या विरोधात सतत शेट्टींचे मोर्चे सुरू आहेत. यामुळे शेट्टींच्या भूमिकेबद्दलही उलट सुलट चर्चा सुरू आहे दरम्यान, शेट्टींच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारची कोंडी वाढणार असल्याचे दिसत आहे.

क्लिक करा आणि वाचा- चिंताजनक! राज्यात आज करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ, मृत्यूही वाढले
क्लिक करा आणि वाचा- नारायण राणेंचे वर्तन दुतोंडी सापासारखे; नीलम गोऱ्हेंचे टीकास्त्र

Source link

Flood Victimsmorcha in sangliRaju Shettyआक्रोश मोर्चाराजू शेट्टीसांगलीत राजू शेट्टी यांचा मोर्चा
Comments (0)
Add Comment