(फोटो सौजन्य : मुंबई विद्यापीठ)
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि राज्याचे उच्च शिक्षण संचालक प्रा. शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक मुंबई विभाग प्रा. केशव तुपे यांच्या उपस्थितीत संचालक कार्यालयातील सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव आणि सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी जी. पी. दाते, वरीष्ठ लेखा अधिकारी महेश पवार यांच्यासह संदेश सावंत, संजय टेमकर, भूषण केणी आणि सुदर्शन बडे यावेळी उपस्थित होते.
विद्यापीठ आणि शासन स्तरावर प्रलंबित असलेली शिक्षक आणि शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेतील प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा व्हावा, तसेच त्यांच्या सेवा पुस्तिका, शासनाकडून वेळोवेळी मिळणारे लाभ, वेतन, निवृत्ती वेतन, निवृत्तीनंतरचे लाभ त्वरीत मिळणे अशा अनुषंगिक बाबींसाठी व प्रलंबित प्रकरणाचा त्वरीत निपटारा व्हावा यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.
(वाचा : ‘एक परीक्षा एक कट ऑफ’ साठी आमदार रोहित पवार आग्रही; सरळसेवा भरतीसाठी One Time Registration तर, परीक्षेसाठी कमी शुल्क घेण्याची मागणी)
विद्यापीठामार्फत उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि प्रधान सचिव श्री. विकास चंद्र रस्तोगी आणि उप सचिव श्री. अजित बाविस्कर यांच्यासोबत बैठका घेऊन प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी शासनास विद्यापीठामार्फत विनंती करण्यात आली होती, त्याचाच परिपाक म्हणून शासनाने अत्यंत आग्रही भूमिका घेत आज मुंबई विद्यापीठात शिबीराचे आयोजन केले आहे. हा अतिशय अभिनव उपक्रम असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या पार्श्वभूमीवर हाती घेण्यात आलेला हा अत्यंत स्तूत्य उपक्रम असून फक्त औपचारीकता म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आलेला नसून यासाठी विभागामार्फत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी तीन टप्प्यांत या कार्यशाळांचे आयोजन सर्व १० परिक्षेत्रातील सहसंचालक कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात सहसंचालक कार्यालय, दुसऱ्या टप्प्यात संचालक कार्यालय आणि तिसऱ्या टप्प्यात शासन स्तरावर ही प्रकरणे निकाली काढली जाणार असल्याचे राज्याचे उच्च शिक्षण संचालक प्रा. शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले.
आज मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ‘उच्च व तंत्र शिक्षण विभाग विद्यापीठाच्या दारी’ उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यशाळेत विविध सेवा प्रकरणे हाताळली गेली.
(वाचा : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल ६ हजार १६० जागांसाठी भरती; देशाच्या विविध राज्यांमध्ये नोकरीची संधी)