नारायण राणेंना एकनाथ शिंदेंचं खणखणीत प्रत्युत्तर, म्हणाले…

हायलाइट्स:

  • एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळल्याचा नारायण राणेंचा दावा
  • एकनाथ शिंदे यांनी राणेंना दिलं जोरदार प्रत्युत्तर
  • राणेंनी हा शोध कुठून लावला?; शिंदेंचा सवाल

ठाणे: ‘नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यात ‘मातोश्री’चा हस्तक्षेप होत असून ते कंटाळले आहेत. लवकरच ते निर्णय घेतील,’ असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वसई येथे बोलताना केला होता. राणेंच्या या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. राणेंचा दावा त्यांनी खोडून काढला आहे. (Eknath Shinde Reply To Narayan Rane)

वाचा:‘राणे काही गोष्टी अमित शहांना सांगू शकले असते, पण त्यांना मोह आवरला नाही’

केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलेल्या नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सध्या राज्याच्या काही जिल्ह्यात सुरू आहे. काल ही यात्रा वसई येथे होती. त्यावेळी बोलताना राणे यांनी शिवसेनेत अंतर्गत मतभेद असल्याचा दावा केला होता. ‘एकनाथ शिंदे यांच्या खात्यात ‘मातोश्री’चा व मुख्यमंत्र्यांचा प्रचंड हस्तक्षेप आहे. त्यामुळं शिंदे कंटाळले आहेत. ते पर्यायाच्या शोधात असून लवकरच योग्य निर्णय घेतील,’ असं राणे म्हणाले होते. राणेंच्या या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून यावर खुलासा केला आहे.

‘माझ्या नाराजीचा शोध राणेंनी कुठून लावला माहीत नाही. पण त्यात तथ्य नाही. मला माझ्या खात्याचे निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. मी माझ्या पक्षात आणि विभागात मोकळेपणानं काम करतो. मी समाधानी आहे. निर्णय स्वातंत्र्य असल्यामुळंच अनेक लोकहिताचे निर्णय मी आातापर्यंत घेऊ शकलो आहे. युनिफाइड डीसीपीरसारखा लोकहिताचा निर्णय माझ्याच कार्यकाळात झाला. समृद्धी महामार्ग यशस्वीपणे पुढं नेतोय,’ असं शिंदे यांनी म्हटलं आहे. ‘माझ्या कामात मातोश्री किंवा मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याच्या वक्तव्यात अजिबात तथ्य नाही. राणे हे स्वत: मुख्यमंत्री होते. धोरणात्मक किंवा मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंच होत असतात, मग खाते कोणतेही असो. राणेंना हे चांगले माहीत आहे. उद्या त्यांना मोठ्या निर्णय घ्यावयाचा असले तरी पंतप्रधानांची संमती लागणार आहे. त्यामुळं त्यांचं वक्तव्य हे केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून हे संभ्रम पसरवण्याचं काम सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचं उत्तम काम सुरू आहे. यापेक्षा अधिक बोलण्याची गरज नाही,’ असा चिमटाही शिंदे यांनी राणेंना काढला आहे.

वाचा: ‘फाळणीसाठी फक्त गांधी, नेहरू, काँग्रेसला जबाबदार धरले जाते कारण…’

Source link

eknath shinde latest newseknath shinde news todayEknath Shinde Reply to Narayan RaneJan Ashirwad YatraNarayan Raneएकनाथ शिंदेनारायण राणे
Comments (0)
Add Comment