हायलाइट्स:
- गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा.
- दोन डोस झालेत त्यांना आरटीपीसीआर चाचणीतून सूट.
- १८ वर्षांखालील मुलांबाबतही जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलासा.
सिंधुदुर्ग: गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाण्यासह विविध भागांतून आपल्या कोकणातील मूळ गावी चाकरमानी येत असतात. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सवाला येतात. गेल्यावर्षी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंधांमुळे अगदीच अत्यल्प प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात आले होते. यंदा मात्र तशी स्थिती नसून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचा ताजा निर्णय पाहता चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ( Sindhudurg Ganeshotsav Guidelines Update )
वाचा:तर नारायण राणे आता बोलणार नाहीत!; चंद्रकांत पाटील यांनी केलं मोठं विधान
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या सर्वच चाकरमान्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यावर विरोधाचा सूर निघू लागला होता. ही बाब लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ज्यांनी करोना वरील लसचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता असणार नाही. तर ज्या नागरिकांनी दोन्ही डोस घेतलेले नाहीत, अशांना जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या ७२ तास आधीचा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत बाळगावा लागेल, असे जिल्हाधिकाऱ्यांकडून नमूद करण्यात आले आहे. १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण अद्याप सुरू झालेले नसल्याने त्यांना जिल्हा प्रवेशासाठी आरटीपीसीआर चाचणी आवश्यक असणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे स्पष्ट केले.
वाचा: नारायण राणे यांना जामीन मंजूर; महाड कोर्टात नेमकं काय घडलं जाणून घ्या
युनिव्हर्सल पास सोबत ठेवा
लसचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना राज्य शासनाच्या epassmsdma.mahait.org या संकेतस्थळावरून युनिव्हर्सल पास उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा पास या नागरिकांनी सोबत ठेवावा म्हणजे तपासणीकरिता लागणाऱ्या वेळेची बचत होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी राज्य शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही त्यांनी नमूद केले.
वाचा:विनायक राऊत यांच्या बंगल्यावर सोडा बॉटल फेकल्या; ‘ते’ हल्लेखोर कोण?