Chandrakant Patil: तर नारायण राणे आता बोलणार नाहीत!; चंद्रकांत पाटील यांनी केलं मोठं विधान

हायलाइट्स:

  • नारायण राणे यांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील बोलले.
  • राणे यांच्या नेतृत्वाखाली जन आशीर्वाद यात्रा पुढे जाणार.
  • कोर्टाची मनाई असेल तर राणे भाषण करणार नाहीत.

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा महाड कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा सत्याचा विजय असल्याचे नमूद करत शिवसेनेवर जोरदार शब्दांत तोफ डागली. राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरूच राहणार असे सांगताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीवरही पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला. ( Chandrakant Patil On Narayan Rane Bail )

वाचा:नारायण राणे यांना जामीन मंजूर; महाड कोर्टात नेमकं काय घडलं जाणून घ्या

पोलिसांच्या साह्याने आणि भाडोत्री गुंडांच्या जोरावर राज्यातलं सरकार चाललं आहे. नारायण राणे यांना अटक करताना पोलिसांचा अमानवीय चेहरा पाहायला मिळाला. ते जेवत असताना त्यांना अटक करण्यात आली. कारवाई करण्याची ही कोणती पद्धत आहे?, असा सवालच चंद्रकांत पाटील यांनी विचारला. राज्यातील सरकार सूडबुद्धीने वागत आहे. यांना सत्तेची नशा चढली आहे. गेल्या १९ महिन्यांत अनेक वेळा कोर्टाच्या थपडा खाऊनही काहीच बदल झालेला नाही, असा निशाणा साधताना पाटील यांनी अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांनाही लक्ष्य केले.

वाचा: नारायण राणे प्रकरणावर शरद पवारांची चार शब्दांत प्रतिक्रिया

नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी मंत्री अनिल परब दबाव टाकत होते. वॉरंटची वाट कशाला पाहता तुम्ही राणेंना अटक करा असा, आदेश त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिला. याची व्हिडिओ क्लिप समोर आली आहे. यासाठी आम्ही परब यांना कोर्टात खेचणार आहोत. पोलीस अधीक्षकांना आदेश देण्याचा अधिकार अनिल परब यांनी कुणी दिला. ते राज्याचे गृहमंत्री आहेत का?, असा सवाल पाटील यांनी केला. नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. घटनात्मक पदावर असतानाही त्या राजकीय पक्षाच्या प्रवक्या असल्याप्रमाणे विधाने करत आहेत. त्यांच्याविरुद्धही आम्ही कोर्टात जाणार आहोत, असे पाटील म्हणाले.

वाचा:‘पोलिसांच्या मदतीने सरकारची दहशत’; विखे पाटलांचा हल्लाबोल

भाजपची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात पोहचण्याआधीच तिथे सात दिवसांची संचारबंदी लावण्यात आली. यात्रेत अडथळा आणण्यासाठीच हे करण्यात आले आहे. मात्र आमची यात्रा थांबणार नाही. संचारबंदी मागे घेतली नाही तर ती मोडून आम्ही यात्रा काढू. नारायण राणेसुद्धा या यात्रेत सहभागी होतील. कोर्टाने काही अटी घातल्या असतील तर राणे यात्रेदरम्यान बोलणार नाहीत. तरीही या यात्रेला हजारोंची गर्दी होईल. इतकी राणे यांची ताकद आहे. आता कोकणातून शिवसेना संपलीच म्हणून तुम्ही समजा, असेही पाटील पुढे म्हणाले. राणे यांना जामीन मिळाल्याने आमच्याबाजूने संघर्षाला आम्ही विराम दिला आहे. मात्र आमची जन आशीर्वाद यात्रा रोखण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही गप्प राहणार नाही. त्याविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.

वाचा:राणे यांचं ते वक्तव्य; नाना पटोले यांनी भाजपवर केला गंभीर आरोप

Source link

chandrakant patil on narayan ranechandrakant patil on narayan rane bailnarayan rane arrest updatenarayan rane bail updatenarayan rane jan ashirwad yatra updateअनिल परबचंद्रकांत पाटीलजन आशीर्वाद यात्रानारायण राणेनीलम गोऱ्हे
Comments (0)
Add Comment