हायलाइट्स:
- नारायण राणेंचा पुन्हा एकदा आक्रमक बाणा
- महाविकास आघाडीविरोधात पुन्हा हल्लाबोल
- टीकाकारांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
मुंबई : अटकनाट्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसंच देशाबद्दल केलेलं चुकीचं वक्तव्य सहन न झाल्याने माझ्या तोंडून ते वाक्य गेलं होतं, असं म्हणत त्यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. या पत्रकार परिषदेत नारायण राणेंचा आक्रमक बाणा पाहायला मिळाला.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या काही जुन्या वक्तव्यांची माहिती देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत केलेलं वक्तव्य, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर बोलताना वापरलेला ‘निर्लज्ज’ हा शब्द आणि नुकतंच एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना झापड मारण्याचा मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा याचा संदर्भ देत राणे यांनी शरद पवारांनाच प्रश्न विचारला.
राणे म्हणाले की, ‘काय पवारसाहेब…काय सज्जनपणा आहे…काय सोज्वळपणा आहे….एवढं चांगलं बोलणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केलं, त्यामुळे त्यांनी काही चुकीचं केलं असं मला वाटत नाही…काय भाषा आहे?’ असा सवाल नारायण राणे यांनी शरद पवारांना विचारला.
शिवसेनेविरोधात राणेंचा पुन्हा हल्लाबोल
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मंगळवारी अटकेत असलेल्या नारायण राणे यांना जामीन मंजूर करताना कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. राणे यांना काही शब्द वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राणेंनी वादग्रस्त शब्द टाळत मात्र आपल्या आक्रमक शैलीतच शिवसेनेचा समाचार घेतला. ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून हे सरकार म्हणजे काही दिवसांचेच पाहुणे असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, १७ सप्टेंबरनंतर माझ्यावर करण्यात आलेल्या टीकेला मी योग्य भाषेत उत्तर देईल, असं म्हणत नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा दिला आहे.