हायलाइट्स:
- राजकीय भाषेवरून शिवसेना व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच
- राणेंनी स्वत:ला बाळासाहेब ठाकरे समजू नये
- संजय राऊत यांचा नारायण राणेंना टोला
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा केल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. आता भाजपकडून शिवसेना नेत्यांच्या व दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या वक्तव्यांचे दाखले दिले जात आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ते ‘इंडिया टूडे’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ‘नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. त्याला कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. त्यांनी लोकांचा आशीर्वाद घ्यावा आणि पुढं जावं. पण प्रत्येक ठिकाणी ते शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढत आहेत. ते आमच्या विरोधात बोलू शकतात. लोकशाही आहे. मात्र, भाषेचा वापर त्यांनी योग्य करायला हवा,’ असं राऊत म्हणाले. ‘नारायण राणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाहीत. त्यांनी मर्यादेत राहावं,’ असं राऊत यांनी एक प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.
वाचा:हायकमांड सक्रिय! अमित शहांचा नारायण राणेंना फोन; काय झाली चर्चा?
राणेंवरील कारवाईशी सूडाच्या राजकारणाचा अजिबात संबंध नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. ‘महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. दोन वर्षांपासून तीन पक्षांचं सरकार व्यवस्थित चाललं आहे. सूडाचं राजकारण करायचं असतं तर दोन वर्षांत आम्ही करू शकलो असतो,’ असं राऊत म्हणाले.
‘नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातून एक मंत्री वाढल्याचा आम्हाला आनंदच होता, पण राणेंची बोलण्याची पद्धत तुम्हाला माहीत आहे. काँग्रेसमध्ये असतानाही सोनिया गांधी, राहुल गांधी, अहमद पटेल यांच्याविरुद्ध काहीही बोलायचे. आता भाजपमध्ये आहेत. राणे हे कोण आहेत? केंद्रीय मंत्री असले म्हणून काय झालं, ते जनतेच्या वर आहेत का? मोदींच्या मंत्रिमंडळात ६० मंत्री आहेत. ते आपापल्या राज्यात जाऊन म्हणायला लागले की मी तिथल्या मुख्यमंत्र्यांना मानत नाही तर मोदींना ते चालेल का? असा सवाल राऊत यांनी केला.
वाचा: गुन्हे, अटक, सुटका, आंदोलन… सगळं शांत होताच राणे बंधूंचं पुन्हा ट्वीट