खूशखबर! नागपुरात जलश्रीमंती; उन्हाळा जाऊ शकतो सुखकर, ‘या’ धरणांमुळे महापालिकेचा दावा

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ६५ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असली नागपूर शहराला सध्या तरी कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. कारण, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह आणि कामठी खैरी या धरणांमध्ये पाण्याची स्थिती समाधानकारक आहे. त्यामुळे शहराला उन्हाळ्यात कमतरता भासणार नाही, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

-शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह जलाशयात जवळपास ७५. १९ टक्के इतका जलसाठा आहे. गेल्यावर्षी २१ डिसेंबरला हे प्रमाण ८३.४४ टक्क्यांपर्यंत होते.

-कामठी खैरीमध्येही (कन्हान नदी) ७१.४४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळात या जलाशयात ९४.८७ टक्के साठा होता. त्यामुळे ही स्थिती समाधानकारक असल्याचे महापालिकेच्या अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले.

-तोतलाडोह जलाशयातून दररोज ४९० एमएलडी, तर कन्हान नदीतून २१० एमएलडी असे एकूण ७०० एमएलडी पाणी घेण्यात येते. त्यामुळे सध्या या दोन्ही जलाशयांची स्थिती बघता पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगण्यात येते.

-एकीकडे, शहराला पाणीपुरवठ्याची चिंता नसली तरी गैरमहसुली पाण्यामुळे होणारे नुकसान रोखण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे आहे. शहरातील गैरमहसुली पाण्याचे प्रमाण अजूनही ४० टक्क्यांच्या जवळपास आहे. मनपाकडे शहराला पुरवठा होणाऱ्या २८० एमएलडी पाण्याच्या हिशोबाची नोंदच नाही.

-शहराचा विस्तार झाल्यानंतर महापालिकेकडून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी अद्ययावत सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. यात ७५ जलकुंभांच्या माध्यमातून हा पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच ज्या भागांत पाणीपुरवठ्याचे जाळे नाही, त्याठिकाणी १६२ टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

-पाण्याची मागणी बघता शहरात आणखी जलकुंभांचे बांधकाम प्रस्तावित असून पाणीपुरवठ्याचे बळकटीकरण करणे हाच त्यामागील हेतू आहे. याचअंतर्गत डिसेंबर अखेरपर्यंत आणखी ११ जलकुंभातून पाणी पुरवठ्याला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती श्वेता बॅनर्जी यांनी दिली.
जाणीव पूर्वक नागपूरला बदनाम करण्याचा प्रकार; विरोधकांना एनसीआरबीचा अहवालच वाचता येत नाही- फडणवीस
-पाणीपुरवठ्याच्या बाबतीत उत्तर नागपूरनंतर सर्वाधिक समस्या असलेला भाग म्हणून दक्षिण नागपूरकडे बघितले जाते. या भागातील ही समस्या बघता हनुमाननगर झोनमध्ये देशातील पहिला डबलडेकर जलकुंभाची उभारणी सुरू आहे. यामुळे दक्षिण नागपूरची पाणी समस्या सुटणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

-इतकेच नव्हे, तर पुढीलवर्षी जूनपर्यंत शहराला टँकरमुक्त करण्याचा महापालिकेचा मानस असून यासाठी शहरातील नागरिकांनी नळांचे कनेक्शन घेत यात हातभार लावावा असे आवाहन बॅनर्जी यांनी केले आहे.

उधळपट्टी नकोच!

पाणीसाठा मुबलक असला तरी पाण्याची उधळपट्टी करू नका, असेही मनपाने म्हटले आहे. आताची स्थिती समाधानकारक आहे. मात्र, पाण्याचा अपव्यय केल्यास स्थिती उलटही होऊ शकते. आपल्याला पाणी जपून वापरायचे आहे, असे आवाहनही मनपाने केले आहे.

Source link

maharashtra dam storage dataNagpur Dam Water StorageNagpur newsकामठी खैरीनागपूर महापालिका
Comments (0)
Add Comment