वाढलेली वाहनांची संख्या लक्षात घेता महामार्ग पोलिसांनी आता पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक १५-१५ मिनिटांसाठी थांबवून त्या लेनवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक कोंडी फोडली जाणार आहे. नाताळ सण दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे सलग सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर चारचाकी वाहनांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होते. त्यामुळे आज शनिवार आणि रविवार तसेच सोमवारी सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत जड वाहनांना माहमार्गावर बंद घालण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे वाहतूक अपर पोलीस महासंचालक डॉ. रविंद्र सिंगल यांनी दिली आहे.
नाताळनिमित्त शाळा व महाविद्यालये, सरकारी कार्यालये यांना सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कारच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. सलग सुट्टी आल्यानंतर घाटामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी जड अवजड वाहनांना थांबविण्यात येते. वाहतूक कोंडी संपल्यानंतर जड अवजड वाहने मार्गस्थ करण्यात येतात. मागील वाहतूक कोंडीची परीक्षण केले असता जड अवजड वाहने आणि कार हे सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत एकत्र आल्यानंतर वाहतूक कोंडी होते.
तरी सर्व जड अवजड वाहन मालक आणि चालक संघटना यांना वाहतूक पोलिसांनी आवाहन करण्यात आले आहे की, शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवशी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवरील प्रवास दुपारी १२ नंतर सुरू केल्यास आपला प्रवास सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होईल. तसेच वाहतूक कोंडी मुळे वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिनचे काम निघणे इत्यादी टळू शकेल. तसेच इंधन आणि वेळची बचत होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.