सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यात आलं हे दिलासादायक आहे. आम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या बाजूनं आहोत. वेगळं आरक्षण मराठा समाजाला मिळेल ज्याला आमचा विरोध नव्हता, असं भुजबळ यांनी म्हटलं. बीडमधील मनोज जरांगेंचं अर्ध भाषण छगन भुजबळ आणि लेकरं वगैरेबाबत होतं, असा टोला भुजबळ यांनी लगावला.
मनोज जरांगेंच्या स्मरण शक्तीमध्ये गडबड आहे. ते एकाच भाषणात दुहेरी बोलतात. जरांगे हॉटेल वगैरे भुजबळांनी जाळल्याचा आरोप करतात, मराठ्यांना डाग लागल्याचं म्हणतात.ते यापूर्वी बीड सरकारी अधिकाऱ्यांनी जाळलं म्हणाले होते. आजच्याच सभेत मराठ्यांच्या वाट्याला जर गेला तर बीडला काय होतं हे लक्षात ठेवा, असं म्हणत असल्याचं छगन भुजबळ म्हणाले. जरांगेंनी अनुलोम, विलोम, प्राणायम, ध्यानधारणा करावी, हा सल्ला त्यांना मित्र म्हणून देतो पण मला ते मित्र मानणार नाहीत असा टोला देखील भुजबळ यांनी लगावला.
मनोज जरांगेंनी बीडच्या सभेत केलेल्या टीकेवर अशा कोल्हेकुईला दाद देत नाही,आयुष्यभर दादागिरीविरोधात लढतोय, जरांगेच्या जन्माअगोदरपासून लढतोय, असं प्रत्युत्तर भुजबळ यांनी दिलं. ते येवल्याचा येडपट म्हणाले मी त्यांचा तो उल्लेख करणार नाही, असंही ते म्हणाले.
२० जानेवारीपर्यंत शांत राहणार आहेत, तोपर्यंत ते रुग्णालयात राहतील किंवा घरी राहतील. तुम्ही तुमची लढाई लोकशाही मार्गानं लढा, आरे म्हटलं तर कारे म्हणणार आहे. मला हौस नाही कुणाला दुखावण्याची, मला जबाबदारी कळते. सारखं सारखं बोलणार असाल तर मग बोलावं लागेल. १९९१ पासून या देशात जातगणना करा अशी मागणी करतोय. देशात विविध राज्यात कुठलिही एक जात मोठी असते. पाटीदार असेल जाट असेल तरी ती १६ टक्क्यांच्या वर नसेल. ओबीसी प्रवर्ग हा ३७४ जातींचा समूह आहे. महाराष्ट्रात ३७४ जाती एकत्र आल्यावर ५४ टक्के होतात. बिहारमध्ये ती ६३ टक्के पर्यंत आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
लोकशाहीच्या मार्गानं आमदार, मंत्र्यांच्या घराबाहेर शांतेतनं बसा, असं छगन भुजबळ म्हणाले. अतंरवाली सराटीत ८० पोलीस जखमी झाले. गृहमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिलं आहे. सगळ्यांची मागणी जातनिहाय जनगणनेची सरकारला मान्य करावी लागेल, असंही भुजबळ म्हणाले.
एकनाथ शिंदेंचं संयमाचं आवाहन
क्युरेटिव्ह पिटीशन २४ जानेवारीला सुप्रीम कोर्ट ऐकणार आहे. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातील जनभावनेचा आदर करुन क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली आहे. २४ जानेवारीला सुनावणी होईल, तज्ज्ञ वकिलांची फौज बाजू मांडेल. सुप्रीम कोर्टात वकिलांची फौज त्रुटी दूर करण्याचं काम करेल. मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी मागच्या सरकारनं पुरावे मांडले नव्हते. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सरकार करेल. तोपर्यंत इतरांनी शांतता आणि संयम बाळगला पाहिजे. सुप्रीम कोर्टात बाबी मांडू आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News