हायलाइट्स:
- शिवसेना-भाजप युतीच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
- उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत आठवलेंची प्रतिक्रिया
- युतीविषयी चर्चा झाली असावी, असा अंदाज केला व्यक्त
अतुल देशपांडे | सातारा :
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयीचं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर घडलेल्या अटकनाट्यामुळे भाजप-शिवसेना यांच्यातील दरी वाढली आहे. मात्र अशा स्थितीतही रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजप-सेना युतीबाबत भविष्यवाणी केली आहे.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झाली असेल. यामध्ये पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहावा, उपमुख्यमंत्रीपद भाजपला द्यावे या पद्धतीची चर्चाही झाली असेल,’ असा अंदाज रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना व भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयोग होत असेल, तर त्याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा, असा सल्लाही आठवले यांनी दिला.
दरम्यान, मोदींविरोधात कोणी कितीही कट कारस्थान केले तरी मोदींना कोणीही अडवू शकत नाही. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा भाजप व रिपब्लिकन पक्षाचेच सरकार सत्तेत येईल, असं भाकित त्यांनी केले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले शनिवारी सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी व आपत्तीग्रस्तांना मदत वाटपासाठी साताऱ्यात आले होते. यापूर्वी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, किशोर गालफाडे, आण्णा वायदंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीत नुकसान झालेल्या कुटुंबांचे अद्यापपर्यंत पुनर्वसन झालेले नाही. या सर्वांचे संपूर्ण पुनर्वसन होण्यासाठी दोन वर्षे लागतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. पण, ज्यांना तात्पुरत्या जागेत ठेवलं आहे, त्यांचं तातडीने चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करावं, तसंच शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मदत द्यावी, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.