पनवेलची तहान भागणार, कुंडलिका नदीचे ५१७ एमएलडी आरक्षित ठेवण्यासाठी प्रस्ताव

कुणाल लोंढे, पनवेल: अत्यंत वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल महापालिका क्षेत्रातील पाण्याची चिंता मिटावी, म्हणून पाण्याचे स्रोत नव्याने निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी पनवेलपासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील टाटा जलविद्युत केंद्र, रवाळजे, भिरा येथून ५१७ एमएलडी पाणी आणण्याच्या पनवेल महापालिकेच्या प्रस्तावाला पाटबंधारे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. कोलाड कार्यकारी अभियंता आणि ठाणे अधीक्षक अभियंता यांनी, पनवेल महापालिकेकडून मोठा महसूल प्राप्त होणार असल्याचे नमूद करत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवला आहे.

सुमारे ११० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या पाण्याची भीषण टंचाई भेडसावत आहे. कायमच वादात असलेली पाणीपुरवठ्याची सुविधा महापालिकेच्या गळ्यात टाकण्याच्या तयारीत सिडको आहे. त्यामुळे भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन पनवेल शहरासाठी पाण्याचे नवे स्रोत निर्माण करणे महापालिका प्रशासनाला क्रमप्राप्त आहे. महापालिकेच्या मालकीच्या धरणाची उंची वाढवणे शक्य झालेले नाही. तसेच नवे धरण बांधणे सद्यस्थितीत शक्य नाही. परिणामी, उपलब्ध स्रोतांमधून पाणी मिळवणे हा एकच पर्याय शिल्लक आहे. रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका असल्यामुळे, जिल्ह्यातील स्रोतांचा शोध घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील टाटा जलविद्युत केंद्र, रवाळजे, भिरा येथून कुंडलिका नदीत सोडले जाणारे पाणी पुढे कुंडलिका नदीवरील काळ सिंचन प्रकल्पात डोलवहाल वळण बंधारा येथे अडवून कुंडलिका डावा व उजवा तीर कालव्याव्दारे अंबा नदीत सोडून सिंचन आणि इतर कारणांसाठी वापरण्यात येते. काळ सिंचन प्रकल्पाअंतर्गत एकूण १८२२ एमएलडी पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी सिंचन, बिगरसिंचन, औद्योगिक कारणासाठी पाणी वितरित करून १७४ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक राहते. १४ दशलक्ष घनमीटर सिंचनामधील पाणी तरतुदींमधून वर्ग केल्यास महापालिकेच्या प्रस्तावानुसार १८८ दलघमी, म्हणजेच ५१७ एमएलडी पाणी महापालिकेला देणे शक्य आहे, असे रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांनी अधिक्षक अभियंता कार्यालयाला पाठवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

गोव्याला जाणं महागणार? महाराष्ट्रातून जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी

१३.८३ कोटी दरवर्षी खर्च

या ५१७ एमएलडी पाण्यासाठी पनवेल महापालिकेला सुमारे १३ कोटी ८३ लाख रुपये दरवर्षी मोजावे लागणार आहेत. याशिवाय ९० किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यासाठी वेगळा खर्च येणार आहे. पाटबंधारे विभागाला दरवर्षी महसूल एवढा मोठा महसूल मिळणार आहे. सध्या समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्यातून पाटबंधारे विभागाला एवढ्या मोठ्या रकमेचा महसूल मिळणार असल्यामुळेच पाटबंधारे विभाग सकारात्मक आहे.

अधीक्षक अभियंता कार्यालयाचीही मंजुरी

रायगड पाटबंधारे विभागाचा प्रस्ताव ८ डिसेंबरला अधीक्षक अभियंता, ठाणे विभागाकडे पाठवण्यात आला. त्यानंतर तातडीने मंजुरी मिळून १९ डिसेंबर रोजी वरिष्ठ कार्यालयाला, म्हणजेच मंत्रालय पातळीवर प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

म्हणून गोपनीयता

पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या २५० एमएलडी पाण्याची गरज आहे. मजीप्रा, सिडको, एमएमआरडीए आणि महापालिकेच्या एकत्रित अमृत योजनेतून महापालिकेला दोन वर्षांत १०० एमएमडी पाणी मिळेल. परंतु वाढत्या पनवेलचा विचार केल्यास पालिकेला पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे. कुंडलिका नदीचे तब्बल ५१७ एमएलडी पाणी मिळाल्यास पुढील काही वर्षांची चिंता मिटणार आहे. याची वाच्यता होऊ नये आणि अडथळे येऊ नयेत, म्हणून महापालिका प्रशासनाकडून गुप्तता पाळण्यात येत होती.

कधी दुष्काळ ओला तर कधी दमडी न हातावर, शेतकरी दिनादिवशी कवींनी व्यथा मांडल्या

Source link

Navi Mumbai newsPanvel Newspanvel water problemकुंडलिका नदीपनवेल न्यूजपनवेल महापालिकापाणीटंचाई
Comments (0)
Add Comment