पुणेकरांचा खोकला जाता जाईना, संसर्गजन्य आजारांत वाढ, खोकला लवकर बरा न होण्याची कारणे कोणती?

म. टा. प्रतिनिधी, पुणे: वारंवार खोकला येणे, घसा खवखवणे, सर्दीमुळे नाक बंद होणे किंवा वांरवार शिंका येणे यांपैकी किमान एक लक्षण सध्या शहरातील बहुसंख्य कुटुंबातील एक ते दोन व्यक्तींमध्ये दिसून येत आहे.

वातावरणातील बदलांमुळे शहरात सध्या सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, सध्या आढळून येणारे रुग्ण तापातून लवकर बरे होत आहेत. मात्र, खोकला बरा होण्यासाठी काही रुग्णांना १५ दिवस ते एक महिना वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे ‘पुणेकरांचा खोकला जाता जाईना,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

शहरात गेल्या काही दिवसांत विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजारांत वाढ झाल्याने या प्रकारचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. सध्या आढळून येणाऱ्या सर्वाधिक रुग्णांत कोरडा खोकला आहे. १८ ते ४५ या वयोगटांतील नागरिकांना या प्रकारचा त्रास होत आहे. थंडीच्या दिवसांत हवा प्रदूषणाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे प्रवास करताना मास्कचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

नवरा-सासूकडून विवाहितेचा शारीरिक छळ, हातपाय ओढणीने बांधून तळ्यात फेकलं; पुणे हादरलं

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे (आयएमए) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘ऑक्टोबरपासून वातावरणात सातत्याने चढउतार होत आहेत. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि रात्री पुन्हा थंडी असे वातावरण असल्याने तापाचे रुग्ण वाढले आहेत. अशा वातावरणात विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. ताप चार ते पाच दिवसांत बरा होतो; परंतु उपचारांचा कालावधी पूर्ण न करणे, स्वत:च्या मनाने औषधे घेणे, उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे या कारणांमुळे काही रुग्णांचा खोकला बरा होण्यास वेळ लागतो.

खोकला लवकर बरा न होण्याची कारणे

– वाढलेले प्रदूषण

– वातावरणातील बदल

– बाहेरील अन्नपदार्थांचे सेवन

– बांधकामांमुळे होणारी धूळ

– मास्कचा वापर न करणे

– उपचारांचा कालावधी पूर्ण न करणे

– थंड हवा

सर्दीमुळे नाक बंद होणे, कोरडा खोकला, घसा खवखवणे या प्रकारचे रुग्ण सध्या आढळत आहेत. खोकला बरा होण्यासाठी वेळ लागत आहे. प्रदूषण, वातावरणातील बदल, बाहेरील अन्नपदार्थ खाणे, धूळ यामुळे या प्रकारचे रुग्ण आढळत आहेत. ‘जेएन-१’ विषाणूच्या रुग्णांत ताप कमी आणि खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे दिसून येत आहेत.

– डॉ. गौरी बेलसरे, कान, नाक, घसा तज्ज्ञ

विषाणूचा प्रादुर्भाव होण्यासाठी सध्याचे वातावरण पोषक असल्याने सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. वातावरणातील उष्णता कमी झाल्यावर विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होत असते.

– डॉ. रोहिदास बोरसे, मेडिसीन विभागप्रमुख, ससून रुग्णालय

सीओपीडी आजार का होतो? व हा आजार नियंत्रणात कसा ठेवाल?

Source link

Health newsinfectious diseasepune diesespune healthPune newsखोकला आजारपुणे न्यूजसंसर्गजन्य आजार
Comments (0)
Add Comment