हायलाइट्स:
- मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचा शंखनाद आंदोलन
- काँग्रेसची भाजपच्या आंदोलनावर सडकून टीका
- करोनाची तिसरी लाट लवकर यावी यासाठी भाजपचा प्रयत्न – सचिन सावंत
मुंबई: राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भारतीय जनता पक्षानं राज्यभर शंखनाद आंदोलन सुरू केलं आहे. करोनाची दुसरी लाट ओसरली असल्यानं आता काही निर्बंधांसह मंदिरं उघडावीत, अशी मागणी भाजपनं केली आहे. काँग्रेसनं या मुद्द्यावरून भाजपच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (BJP Protest To Reopen Temples)
वाचा: ‘एका मंत्र्यास खाऊन-पिऊन जामिनावर सोडले तरी थयथयाट करणारा भाजप आता…’
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपच्या शंखनाद आंदोलनाची खिल्ली उडवताना त्यांनी भाजपला शंखासुराची उपमा दिली आहे. ‘शंखासूर भाजप आंदोलनातून सरळ सरळ करोना निर्बंधांचे उल्लंघन करत आहे. चंद्रकांत पाटील स्वतः मास्क घालत नाहीत. मोदी सरकारच्या निर्देशांनाही किंमत देत नाहीत. अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून अध्यात्म या पवित्र मार्गाचे विकृतीकरण हिंदू धर्माचा अवमान आहे. भाविकांच्या जीवाचीही यांना पर्वा नाही,’ असा संताप सावंत यांनी व्यक्त केला आहे. सावंत यांनी याच मुद्द्यावरून भाजपची कोंडी करणारे प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘केंद्र सरकारनं स्वत: उत्सवांवर निर्बंध घालण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपा नेते मोदींविरुद्ध आंदोलन करणार का? भाजप सरकारांनी कावड यात्रेवर बंदी का घातली?,’ असा सवाल सावंत यांनी केला आहे.
‘करोनाची दुसरी लाट वाढवण्याचं काम भाजपनं केलं. आता तिसरी लाट लवकर यावी यासाठी यांचा प्रयत्न आहे. रुग्ण वाढले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीका करतात, दुसरीकडे भाजप नेते रुग्ण वाढतील हा प्रयत्न करतात. जनतेच्या जीवाशी खेळ मांडला आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करावी, बघ्याची भूमिका घेऊ नये,’ असं आवाहनही सावंत यांनी केलं आहे.
वाचा: नारायण राणेंची आज पोलिसांसमोर पहिली हजेरी; पोलिस बंदोबस्त वाढवला