हायलाइट्स:
- सुजय विखे पाटलांच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
- दिवाळीनंतर राज्यात सत्ताबदल होणार असल्याचा दावा
- रोहित पवारांच्या मतदारसंघात केलं वक्तव्य
अहमदनगर : ठाकरे सरकार कोसळणार असल्याचा दावा भाजपच्या अनेक नेत्यांकडून केला जातो. यामध्ये आणखी एका खासदाराची भर पडली आहे. भाजप खासदार सुजय विखे पाटील (BJ MP Sujay Vikhe Patil) यांनी दिवाळीनंतर राज्यात भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा केला आहे.
केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी कर्जत तालुक्यात आलेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासमोर राज्य सरकारच्या योजनांसंबधीच्या तक्रारी आल्या. तो धागा पकडून विखे पाटील म्हणाले, ‘थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात विखे यांनी हे विधान केल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.
रोहित पवार यांच्या मतदारसंघात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कर्जत आणि जामखेड या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होणार असून त्या पार्श्वभूमीवर या हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी खासदार विखे पाटील आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यात आढावा बैठका घेतल्या. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. सरकारी लसीकरण केंद्राचाही आढावा घेऊन लसीकरणाला अधिक गती देण्याच्या सूचना केल्या.
कर्जत पंचायत समितीमध्ये आढावा बैठकीमध्ये नागरिकांनी अनेक प्रश्न आणि समस्या सुटत नसल्याबद्दल तक्रारी केल्या. त्यांना उत्तर देताना विखे म्हणाले, ‘दिवाळीनंतर आपल्या विचारांचे सरकार राज्यात सत्तेवर येणार आहे. यामुळे तुमचा कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही. थोडे दिवस थांबा.’ असं डॉ. विखे पाटील म्हणाले.
केंद्र सरकारच्या योजना सांगताना सुजय विखे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं, तर राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत ७२ हजार कोटी रुपये दिले आहेत. मात्र दुसरीकडे राज्य सरकारने दोन लाख रुपयांची कर्जमाफी व नियमित पैसे भरणाऱ्यांना ५० हजार रुपये विशेष सवलत जाहीर केली. परंतु ती केवळ कागदावरच राहिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, शेतमजूर, महिला, पुरुष, विद्यार्थी आणि युवक यांच्यासाठी विविध योजना देशांमध्ये राबवल्या आहेत. संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशामध्ये नागरिकांसाठी करोनाची प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली. जेथे लसीकरण कमी झालं आहे, तेथे विशेष मोहीम राबवली जाणार असून १५ सप्टेंबरपर्यंत सर्व गावांमध्ये लसीकरणाचे प्रमाण सारखं झालेलं असेल,’ असं सुजय विखे पाटील म्हणाले.