वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीकडे लोकसभेच्या १२ जागांची मागणी केलीये. याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना विचारले असता, प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार जागा मागत आहेत. संजय राऊत यांची २३ जागा शिवसेनेला मिळाव्यात, अशी इच्छा आहे. प्रकाश आंबेडकर यांची १२ जागांची इच्छा आहे. शरद पवार गटाची काही इच्छा असेल. अशी गोळा बेरीज केली तर आकडा ४८ च्या वर जाईल. परंतु जिंकण्याची परिस्थिती कोणाची आहे, कोण जागा निवडून आणू शकतो, हेच जागा वाटपाचं समीकरण असणार आहे असे अशोक यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत अद्याप लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही. जो पर्यंत काँगेसचे केंद्रीय श्रेष्ठी निर्णय देत नाहीत, तो पर्यंत आम्हाला थांबावं लागणार असल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
दरम्यान लोकसभा निवडणुकी संदर्भात काँग्रेसची दिल्ली येथे एक बैठक देखील पार पडली. दिल्लीच्या केंद्रीय समितीने महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती देखील जानुन घेतली. राज्यातील कोणत्या जागा लढण्यासाठी सोईच्या असतील याबाबत चर्चा झाली. राजकीय समीकरणाची माहिती आम्ही केद्रीय समितीला दिल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. बाकीच्या पक्षाशी बोलणी अजुन सुरू आहे, त्यांची मत जाणून घेउन निर्णय होईल असं चव्हाण म्हणाले.
‘वंदे भारत’ ट्रेन नांदेड पर्यंत का नाही?
जालना ते मुंबई अशी वंदे भारत रेल्वे शनिवार पासून सुरू झाली मात्र वंदे भारत ही गाडी नांदेडपासून का नाही? असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी केला. नांदेड- मुंबई , नांदेड-हैदराबाद अशी का नको? असा सवाल अशोक चव्हाण यांनी विचारला. राज्यातून गुजरातला जाण्यासाठी ५४ विमान आहेत , पण आपल्या राज्यातून आपल्याच राज्यात जाण्यासाठी फक्त १६ विमान आहेत, हे नियोजन चुकीचं असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. केंद्राचे लक्ष मराठवाड्याकडे नाही असा आरोप देखील अशोक चव्हाण यांनी केला.