प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत महत्त्वाची भूमिका राहील. आम्ही सर्वांनी संविधानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आलं पाहिजे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरलेला आहे त्यावर शिक्कामोर्तब व्हायचं आहे. उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार आणि मल्लिकार्जून खरगे दिल्लीतील बैठकीत होते. दिल्लीत त्यावेळी वरिष्ठ नेते होते, लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला निश्चित झालेला असून अधिकृत शिक्कामोर्तब व्हायचं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
महाराष्ट्रातील गुंतवणूक दुसऱ्या राज्यात आहे, राज्यावर अन्याय होत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार ही राज्यं सामाजिक उपक्रमांमध्ये आपल्या राज्याच्या पुढे गेली आहेत.महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे. या सरकारला २०० आमदारांचं पाठबळ असलं तरी विकास त्या वेगात होताना दिसत नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. पाणी प्रश्न, अतिवृष्टी आणि दुष्काळ हे आव्हान राज्य आणि देशासमोर आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सायबर क्राइमचे विषय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येतात. सरकारनं १५ दिवसांपूर्वी नवे कायदे मंजूर करुन घेतले त्यात फोन टॅपिंग अधिकृत करण्यात आलं आहे, असा दावा देखील सुप्रिया सुळे यांनी केला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
या वर्षी देशातील निवडणुका संविधानाप्रमाणं आणि पारदर्शकपणे व्हावीत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. लोकसभेची निवडणूक आहे त्यानंतर विधानसभेची निवडणूक असल्यानं हे वर्ष राज्य आणि देशासाठी महत्त्वाचं आहे, असंही त्या म्हणाल्या.
उद्धव ठाकरेंवर बोलल्याशिवाय विरोधकांची हेडलाइन होत नाही, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं. देशात कुणाची सत्ता असू देत पण तो संविधानाप्रमाणं सत्तेत आलेला असावा. महाविकास आघाडीत १५ ते १६ जानेवारीपर्यंत कोण कुठल्या जागेवरुन लढणार हे स्पष्ट होईल. त्यानंतर उमेदवार निश्चित केले जातील, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. इंडिया आघाडीत प्रत्येक राज्यासाठी वेगळा निर्णय असेल. राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा सुरु होणार आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक आहेत ते तयारी करत आहेत, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
Read Latest Maharashtra News And Marathi News