एरंडोल येथील पोलीस निवासस्थानांची झाली कमालीची दुर्दशा..

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)

एरंडोल:-शासकीय नोकरी म्हटली की स्वतःची व्यथा मांडता येत नाही व कथा ही सांगता येत नाही.त्यात पोलीस खात्यात सेवेत असलेले पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करतात पण त्यांना त्यांच्या राहत असलेल्या निवासस्थानांच्या झालेल्या दुर्दशेबाबत एफ.आय.आर नोंदवता येत नाही.असे वास्तव एरंडोल येथील धरणगाव हायवे चौफुली लगत असलेल्या पोलीस निवासस्थानांच्या (क्वार्टर) बाबतीत आहे,एखादा शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सेवानिवृत्त होईल इतक्या वर्षांपासूनची एरंडोल येथील पोलीस निवासस्थाने बांधण्यात आलेली आहेत,याठिकाणी एकूण २७ निवासस्थाने असून त्यांची मोठ्या प्रमाणावर दैन्यावस्था झाली आहे.


प्रत्येक निवासस्थानाच्या स्लॅब ला मोठ-मोठाले तडे पडले आहेत,दरवाज्यांच्या चौकटी भिंतीपासून वेगळ्या झालेल्या आहेत,दरवाजे बंद केले तर ते लवकर उघडत नाहीत व उघडले तर लवकर बंद होत नाहीत अशी दुर्दशा दरवाजांची झाली आहे.
एरवी एखाद्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी जिवाचे रान करणारे पोलीस कर्मचारी ड्यूटी संपल्यावर घरी पोहोचले तर त्यांच्या कुटुंबीयांना व त्यांना जीव मुठीत घेऊन कोंबडीच्या खुराड्या सारख्या खोल्यांमध्ये राहावे लागत आहे. वेळप्रसंगी स्लॅब कोसळून जीवितहानी होण्याचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो.


जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी याप्रकरणी लक्ष घालून पोलिसांना किमान सुरक्षित निवासस्थाने उपलब्ध करून द्यावीत अशी अपेक्षा आहे. विशेष हे की, दरवर्षी वेळोवेळी स्थानिक पोलिस प्रशासनातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदने देण्यात आलेली असून त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आलेल्या आहेत.


सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी कधीही या वसाहतीला भेट दिलेली नाही किंवा पाहणी केलेली नाही. अश्या स्थितीत ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार,अशी अवस्था येथील निवास स्थानांमध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची झाली आहे.

Comments (0)
Add Comment