हायलाइट्स:
- शिर्डी साईबाबा संस्थानच्या ‘सीईओ’पदी भाग्यश्री बानायत.
- भाग्यश्री बानायत २०१२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी.
- विद्यमान सीईओ कान्हुराज बगाटे यांची अखेर झाली बदली.
अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भाग्यश्री बानायत-धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कान्हुराज बगाटे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, बगाटे यांच्या नियुक्तीलाच आव्हान देण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून यासंबंधी न्यायालयीन याचिका सुरू असून स्थानिक पातळीवरही बगाटे यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांचे खटके उडाले आहेत. ( Bhagyashree Banayat New Ceo Of Shirdi Sansthan )
वाचा:अनिल देशमुखांच्या जावयाला CBIने घेतले ताब्यात; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
नव्याने सीईओ म्हणून नियुक्ती झालेल्या भाग्यश्री बानायत २०१२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या नागपूर येथे रेशीम उद्योग संचालनालयात संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्या मूळच्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. आयएएस झाल्यानंतर त्यांची नागालँड केडरमध्ये निवड झाली. २०१८ मध्ये त्या प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात परतल्या आहेत. त्यांनी मोठ्या कष्टाने शिक्षण पूर्ण केले असून आतापर्यंतच्या नोकरीत आपली छाप पाडली आहे. महाराष्ट्रात परत आल्यानंतर रेशीम उद्योग संचालयानालयात कार्यरत असताना त्यांनी करोना काळात केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली. त्यांना अनेक सन्मानही मिळाले आहेत.
वाचा:अनिल देशमुखांच्या जावयासोबत काय घडलं?; राष्ट्रवादीने विचारला गंभीर सवाल
शिर्डीचे सध्याचे सीईओ बगाटे यांची नियुक्ती वादग्रस्त ठरली. नियुक्तीच्यावेळी आयएएस नसल्याने त्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. याशिवाय त्यांच्या कामकाजाबद्दल इतरही अनेक तक्रारी झाल्या. न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाच त्यांची बदली झाली असून मंगळवारी झालेल्या बदल्यांमध्ये त्यांच्या नव्या नियुक्तीचे ठिकाण मात्र दाखविण्यात आलेले नाही.
शिर्डी संस्थानचे सीईओ पद आयएएस दर्जाचे केल्यानंतर या पदावर पहिली नियुक्ती रुबल अग्रवाल-गुप्ता यांची झाली होती. त्यानंतर आलेले अधिकारी आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. विश्वस्त मंडळाची मुदत संपल्याने संस्थानचा कारभार तदर्थ समितीमार्फत केला जात आहे. यामध्ये सीईओची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे गेल्या काही काळापासून स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी आणि संस्थानच्या प्रशासनात खटके उडण्याचे प्रमाण वाढले आहे. बगाटे यांच्या बाबतही तसेच झाले. त्यांच्यासंबंधी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दोन दिवसांपूर्वीच सुनावणी झाली. त्यावर पुढील सुनावणी १५ सप्टेंबरला होणार आहे. त्यातच शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीचा विषयही न्यायालयात गेला आहे. ती प्रक्रियाही रखडली आहे. या पार्श्वभूमीवर सीईओपदी महिला अधिकाऱ्याची करण्यात आलेली नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
वाचा: राज्यात पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा; चंद्रकांत पाटलाचा मुख्यमंत्र्यांवर वार