हायलाइट्स:
- राज्यात आज तब्बल १८ गावांचं आंदोलन
- ‘या’ मागणीसाठी बेमुदत ठिय्या करणार
- या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यात धुमाकूळ घालत अनेकांचा बळी घेणाऱ्या वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करावा या मागणीसाठी वनसंरक्षक कार्यालयासमोर बुधवार दिनांक १ सप्टेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी या आंदोलनात राजकीय पदाधिकारी सरपंचासह आंबेशिवनी, आंबेटोला, भिकारमौशी, खुर्सा, गिलगाव, मुरमाडी, अमिरझा, मौशीखांब, टेम्भा, धुंडेशिवनी, राजगाटा चक, उसेगाव, जेप्रा, दिभना, गोगाव आदी १८ गावांमधील शेतकरी सहभागी झाले आहे.
भारतीय जनसंसद शाखा गडचिरोली सह ग्रामपंचायतींच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान विविध मागण्या करण्यात आल्या. त्यात वाघाच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबास पंचवीस लाखांची एकरकमी मदत द्यावी, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
इतकंच नाहीतर वाघामुळे जखमी झालेल्या व्यक्तीस ५ लाख रुपये देण्यात यावेत. गडचिरोली आणि वडसा वनविभागातील उपवनसंरक्षक यांनी नरभक्षी वाघांच्या बंदोबस्त करिता कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे निष्पाप ११ लोकांचा बळी गेला. यास जबाबदार दोन्ही वन विभागातील उपवनसंरक्षकावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, आदी मागण्यांचे निवेदन वनसंरक्षक डॉक्टर किशोर मानकर यांना देण्यात आले.
या गावकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व जन संसदचे पदाधिकारी नीलकंठ संदोकर, विजय खरवडे, रमेश बांगरे, गडचिरोली पंचायत समितीचे सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे आंबेशिवनीचे उपसरपंच योगाजी कुडवे आदींनी केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.