बॉस इज अल्वेज राईट असतो,जाधव यांचा विनाकारण गैरसमज झाला: संजय पवार
दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघावरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. तर,या भेटीवरून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी नाराजी दर्शवत राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती. यामुळे त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून जाधव उद्या पत्रकार परिषद घेत आपली पुढची भूमिका जाहीर करणार आहेत.
ठाकरे गटाचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी मुरलीधर जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असून जिल्हाप्रमुखांची नियुक्त करणे किंवा रद्द करणे हे सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत. १८ ते १९ वर्ष शिवसेनेसाठी चांगले काम केल ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत. मात्र, मातोश्रीवर कोणी जायचं आणि कोणी नाही जायचं याचा अधिकार आपल्याला नसतो. मात्र त्यावरून मुरलीधर जाधव यांचा विनाकारण गैरसमज झाला आहे. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये. त्यांनी पक्षासोबतच राहावं पक्षाने आपल्याला भरपूर काही दिलं आहे. हा जो निर्णय घेतला आहे तो उद्धव ठाकरे यांनी का घेतला याचा विचार आपण करायचा नाही. कारण बॉस इज अल्वेज राईट असतो असे संजय पवार म्हणाले आहेत.
मुरलीधर जाधव शिंदे गटात येणार असतील तर चांगलच : राजेश क्षीरसागर
मुरलीधर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्यानंतर शिंदे गटाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले करण्यात आले आहेत. राजेश क्षीरसागर यांनी मुरलीधर जाधव यांची पाठराखण केली असून पहिल्यापासून आमची ही भूमिका हीच होती की आमच्यावर अन्याय होतोय. ठाकरे गटात आम्हाला आमचं मत सुद्धा व्यक्त करता येत नव्हतं. लोकांचं मत आम्हाला विधानसभेत मांडता येत नव्हतं इतका दबाव आमच्यावर होता.मुरलीधर जाधव यांना ही आता कळाले आहे बाकीच्यांना लवकरच कळेल, असं राजेश क्षीरसागर म्हणाले.
मुरलीधर जाधव यांनी मांडलेले मत म्हणजे जनतेचे मत आहे. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपल्या लोकांची किंमत ठेवायची नाही, आपल्या लोकांचा ऐकायचं नाही. आपल्या सत्तेचा वापर इतर पक्षाला कसा होईल यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच शिवसेनेत ही पडझड झाली आहे. मुरलीधर जाधव हा एक चांगला कार्यकर्ता आहे. आम्हाला जरा लवकर कळालं मात्र त्यांना वेळाने कळालं आहे. पक्ष वाढवण्याचे काम हे प्रत्येक जण करत असतो. मुरलीधर जाधव शिंदे गटात येणार असतील तर चांगलच आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे क्षीरसागर म्हणाले आहेत. यामुळे मुरलीधर जाधव हे उद्या काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News