विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी १७ आणि १८ फेब्रुवारीला या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिली. या स्पर्धेला एआयएसएसएमएसच्या आयओआयटी कॉलेजचे सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. टी. जी सितारामन यांच्या हस्ते नुकतेच दिल्ली येथील मुख्य कार्यालयात करण्यात आले असून, ते उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी चार लाखांहून अधिक रकमेची पारितोषिके या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना संस्थेच्या innovateyou.in या वेबसाइटवर नाममात्र शुल्कात ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची असून, नोंदणी करण्याची अंतिम तारीख ५ फेब्रुवारी आहे. आधुनिक शेती, वाहतूक, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य यांमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने काय कल्पक उपाय निघू शकतात याचा शोध या स्पर्धेत घेतला जाईल. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुक्कामाची आणि खाण्याची सोय केली जाणार आहे, असे यादव यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडवण्याचे प्रयत्न :
महाराष्ट्रात हॅकॅथॉनसारख्या स्पर्धेचे प्रमाण तुलनेने कमी आहे. यातून अनेक उद्योजक घडू शकतात. आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उत्तम व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध केले जाणार आहे. ग्रामीण भागातील कल्पक प्रकल्पांना व्यवसायात उतरण्यासाठी अर्थसहाय्य करण्याचा इनोव्हेशन फाउंडेशन आणि आयओआयटीचा मानस असल्याचे कल्पेश यादव आणि डॉ. प्रदीप माने यांनी सांगितले.