गेल्या काही वर्षांपासून नागपुरातील वाहतूक व्यवस्था जीवघेण्या पातळीवर असून, पोलिस वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावू शकलेले नाहीत, हे वास्तव आहे. चालान करण्यात व्यस्त असलेले वाहतूक पोलिस यावर्षी तरी उपराजधानीतील वाहतूक व्यवस्था वठणीवर आणतील, अशी अपेक्षा नागपूरकरांना आहे.
गेल्यावर्षी प्राणांतिक अपघातांच्या संख्येत चार टक्क्यांनी वाढ झाली. गेल्यावर्षी झालेल्या अपघातात ९० पादचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, १८१ जण जखमी झाले. धोकादायकरीत्या वाहने चालविण्यातही नागपूरकर आघाडीवर आहेत. अशा पद्धतीने वाहने चालविल्याने २५६ अपघात झाले असून, यात ६१ पुरुष व ९ महिला ठार झाल्या. दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे अपघातांच्या १२ घटना घडल्या. यात दोन महिलांसह तिघांचा यात मृत्यू झाला. राँग साइड वाहन चालविल्याने अपघातांच्या १७ घटनांत सात जणांचा मृत्यू झाला.
चारचाकींचा सर्वाधिक समावेश
रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांपैकी चारचाकी वाहनांनी सर्वाधिक अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्यावर्षी झालेल्या १,२१६पैकी ४८७ अपघातांमध्ये कार व अन्य चारचाकी वाहनांचा समावेश असल्याचे आढळून आले आहे. दुचाकी वाहनांनी ३२७ तर जड वाहनांनी १९५ अपघात घडल्याची नोंद आहे.
सकाळी ८ ते मध्यरात्री १२ धोक्याचे
नागपुरात सकाळी ८ ते रात्री १२ ही वेळ धोक्याची असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०२३मध्ये सर्वाधिक अपघात या वेळेतच झाले. या कालावधीत १,०१३ अपघांताची नोंद झाली असून, मध्यरात्री १२ ते सकाळी ८ या वेळेत २०३ अपघात घडले.