भाजप कार्यालयात मंगळवारी नाशिकच्या माजी तहसीलदार राजश्री अहिरराव, छत्रपती उदयनराजे यांच्या भावजयी सोनाली राजे पवार, काँग्रेसच्या माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी भविष्यातील बड्या राजकीय प्रवेशाचे संकेत दिले.
गिरीश महाजन म्हणाले…
– विविध पक्षांतील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये ओघ वाढत आहे
– लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत
– आमदार अपात्रतेप्रकरणी मोठा भूकंपही होणार नाही, पण निकाल काय लागेल हे सांगता येत नाही
– उद्धव ठाकरे यांचा न्यायालय आणि निवडणूक आयोगावर विश्वास नाही
– आमच्याकडे २१० च्या वर आमदारांची संख्या आहे, एकनाथ शिंदेंची बाजू भक्कम आहे
‘आंदोलनाची वेळ येणार नाही’
कांदा निर्यातबंदी केल्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी आपण स्वत: चर्चा करून त्यांची नाराजी दूर करणार आहोत, असे महाजन यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल आणि शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असा दावाही त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या मागणीबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. याबाबत शेतकऱ्यांशी दोन दिवसांत चर्चा करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.