रवींद्र चव्हाण यांनी रायगड लोकसभेमध्ये धैर्यशील पाटील यांचा असलेला प्रवास त्यांचा संपर्क आहे असं सांगत त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. यामुळे आता लोकही विचार करायला लागले आहेत की, कोणाला तरी नवीन चांगल्या उमेदीच्या कार्यकर्त्याला या रायगड-रत्नागिरी लोकसभेमधून प्रतिनिधित्व करता आलं पाहिजे, असं रवींद्र चव्हाण म्हणाले. वाढता पाठिंबा लक्षात घेता सर्व स्तरावर धैर्यशील पाटील यांचे नाव चर्चेत असल्याचं स्पष्ट मत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलं.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये उमेदवारीसाठी तुमचं नाव चर्चेत असल्याचे प्रश्न विचारला असता या प्रश्नावर रवींद्र चव्हाण यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. कोणी निवडणूक लढवायची याचा निर्णय भाजपमध्ये केंद्रीय नेतृत्व घेतं. पार्लमेंटरी बोर्ड सांगेल तो कार्यकर्ता या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून निवडणूक लढवेल असे सांगत एकीकडे किरण सामंत यांचेही टेन्शन चव्हाण यांनी वाढवलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड-रत्नागिरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी निवडणूक लढवावी असं सगळ्याच कार्यकर्त्यांचं मत आहे व या दोन्हीही मतदारसंघांमध्ये भाजपला वाढता पाठिंबा आहे, असं चव्हाण म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सगळ्या कायदेशीर बाजू तपासून निर्णय दिला आहे. हा निर्णय कोणाला पटला नसेल तर वरच्या कोर्टात दाद मागता येते. वरच्या कोर्टात जाण्याचा कायदेशीर मार्ग आहे, असा सल्लाच रवींद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना दिला आहे.
रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्री चव्हाण यांनी दापोली येथील भाजपाच्या कार्यालय नूतनीकरणाच्या उद्घाटनाप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष संजय सावंत, नगरसेविका जया साळवी,महिला आघाडीच्या स्मिता जावकर, युवक प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षय फाटक, कामगार आघाडीचे स्वरूप महाजन आदी उपस्थित होते.
Read Latest Maharashtra News And Marathi News