काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?
“एका वाक्यात सांगायचं तर आज एक सर्कल पूर्ण झालं आहे. आज म्हणण्यापेक्षा दहा तारखेला (दहा जानेवारी – राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेबाबत निकाल दिल्याचा दिवस). शिवसेनेतील ज्या दिग्गज नेत्यांना या माणसामुळे बाहेर जायला लागलं होतं. त्याच्याच हातातून पक्ष सुटला” अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचं विश्लेषण करण्यासाठी बोलावलेल्या ‘जनता न्यायालया’वर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ताशेरे ओढले आहेत. “ही कल्पना जगात भारी आहे. आपल्या मनासारखा निकाल लागला नाही, तर आपलं स्वतःचं न्यायालय स्थापन करून आपल्या आवडीचा निर्णय लावून घ्यायचा…लई भारी!!” अशी पोस्ट देशपांडेंनी ‘एक्स’वर केली आहे.
आदित्य ठाकरेंची पाठराखण
याआधी, मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला, पण तुम्ही ज्या भावाबरोबर लहानाचे मोठे झालात, त्याच्यावर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली होती. शर्मिला ठाकरे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी स्थापन एसआयटी चौकशीवरून आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती. त्यावरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले होते. त्यावर शर्मिला यांनी डिसेंबर महिन्यात प्रतिक्रिया दिली होती.
“मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला, ज्या भावासोबत तुम्ही लहानाचे मोठे झालात, त्याला किणी केसच्या वेळी काय मदत केलीत? आजपर्यंत टोमणे देणं त्यांनी कधी थांबवलं आहे? कुठचीही वेळ आली की किणी केसवरुन टोमणे देतात. तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा, मग आम्हीपण आभार मानू” असंही शर्मिला ठाकरे त्यावेळी म्हणाल्या होत्या.
Read Latest Maharashtra Updates And Marathi News