हायलाइट्स:
- महाराष्ट्राला दरमहा तीन कोटी लशी द्या.
- राज्य सरकारने केंद्राकडे केली मागणी.
- दररोज २० लाख डोस देण्याची क्षमता.
पुणे: राज्यातील करोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. सध्या राज्याला केंद्र सरकारकडून सव्वाकोटी एवढाच डोस दरमहा मिळत आहे. मात्र, दररोज १५ ते २० लाख लशीचे डोस देण्याची राज्याची क्षमता असल्याने दरमहा तीन कोटी लशी द्या, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे केल्याचे सांगितले. ( Maharashtra Covid Vaccination )
वाचा: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘हा’ मोठा दिलासा
सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी ते बोलत होते. ‘राज्यातील प्रत्येक नागरिकांना करोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी लसीकरणाची क्षमता वाढविली आहे. त्यामुळे दर महिन्याला तीन कोटी डोस मिळावे अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे,’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
वाचा: मुख्यमंत्र्यांची ‘ही’ सूचना राष्ट्रवादीने पाळली; तातडीने घेतला मोठा निर्णय
‘राज्यासह देशात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी आरोग्याच्या सुविधांकडे दुर्लक्ष होते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) पाच टक्के खर्च आरोग्यावर करावा, असे नियोजन आयोगाचे म्हणणे आहे. परंतु, प्रत्यक्षात आरोग्यावर ०.९ टक्के खर्च सरकार करते. मात्र करोना साथीच्या काळात सरकार आणि नागरिकांचे डोळे उघडले आहेत. आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढविण्यावर आता भर दिला जात आहे,’ याकडे टोपे यांनी लक्ष वेधले.
शाळेचा निर्णय मुख्यमंत्री घेणार
राज्यातील शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न आता सर्वच स्तरातून विचारला जात आहे. त्याबाबत प्रश्न विचारता टोपे म्हणाले,’शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार केला आहे. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत त्यांनी नियमावली तयार केली आहे. त्या आधारावर शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तयार केला आहे. तो मान्यतेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात येईल. त्यावर मुख्यमंत्री शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतील.
वाचा:…तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती