डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१९ मध्ये ६ लाख ३४ हजार ५५४ इतकी मतं घेऊन निवडून आले होते. त्यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांना ५ लाख ७६ हजार २ इतकी मते मिळाली होती. त्यामानाने आढळराव पाटलांनी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या अमोल कोल्हे यांना तगडी टक्कर दिली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत अनेक गणिते बदलली आहेत. कारण दोन मोठ्या पक्षांमध्ये फाटाफूट झाली आहे. सेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे शिरूरमध्ये मोठी रंगत आलीये. मात्र शिरूर मतदार संघ कुणाच्या वाट्याला येतो, यावर पुढची गणिते ठरणार आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढण्यास अनेक इच्छुक आहेत. शिंदे शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील, अजित पवार गटाकडून विलास लांडे आणि पार्थ पवार, भाजपकडून महेश लांडगे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मतदार संघातील सध्याचे दौरे बघता आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
कशी असतील मतदारसंघातील राजकीय समीकरणे
खासदार डॉ. अमोल कोल्हे शरद पवारांशी एकनिष्ठ राहिल्याने त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. तर विरोधक असणारे शिवाजी आढळराव यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेत शिंदे गटाशी जुळवून घेतल्याने त्याचा थोडा बहुत तोटा त्यांना होऊ शकतो. अमोल कोल्हे यांनी मागील पाच वर्षात संसदेत उत्तम कामगिरी केली असली तरी मतदारसंघात त्यांनी फारसा संपर्क ठेवला नाही. मतदारसंघात ते फारशे सक्रीय नसल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. या गोष्टींमुळे अमोल कोल्हेंच्या विरोधात जनमत जाऊ शकतं.
मतदार संघात कुणाचे पारडे जड?
आढळराव पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. गावोगावी जाऊन ते मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत. त्यांना मतदारसंघातील नागरिकही मोठा प्रतिसाद देत आहेत. दुसरीकडे डॉ. अमोल कोल्हे यांनीही शेतकरी प्रश्नावरून मोर्चा काढून शेतकऱ्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडले. कांदा निर्यातबंदीवरून सरकारला धारेवर धरलं. दुसरीकडे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या गटात न जाता शरद पवार यांच्याशीच एकनिष्ठ राहणं पसंत केल्याने सहानुभूतीचा फायदाही त्यांना होऊ शकतो.