म. टा. प्रतिनिधी, नाशिक : अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना होत असताना पूर्वसंध्येस रविवारी अवघे शहर राममय झाले. राममुद्रेच्या ध्वजांची खरेदी, आजचा (दि.२२) उत्सव घराघरात, वसाहती आणि सोसायट्यांमध्ये साजरा करण्यासाठीची पूर्वतयारी, मिठाईच्या दुकानांमध्ये झालेली गर्दी, विद्युत रोषणाईसह भाविकांच्या तुडूंब गर्दीने उजळलेली मंदिरे अशा वातावरणात रामभूमी अर्थात तीर्थनगरी नाशिक उजळून निघाल्याचे दृश्य रविवारी रात्री शहरात बघायला मिळाले.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे जागोजागी अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण आहे. विविध धार्मिक-सांस्कृतिक संस्था, व्यक्ती आदींच्या माध्यमातून शहरात आज दिवसभरात शेकडो धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू रामचंद्र आणि हनुमंतासह सर्व देवतांच्या मंदिरात आज दुपारी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी महाप्रसाद वितरण, भजन, पूजन, कीर्तन, नामस्मरण, रामायण पाठ, पालखी सोहळे अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे जागोजागी अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण आहे. विविध धार्मिक-सांस्कृतिक संस्था, व्यक्ती आदींच्या माध्यमातून शहरात आज दिवसभरात शेकडो धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू रामचंद्र आणि हनुमंतासह सर्व देवतांच्या मंदिरात आज दुपारी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी महाप्रसाद वितरण, भजन, पूजन, कीर्तन, नामस्मरण, रामायण पाठ, पालखी सोहळे अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिक घराबाहेर…
रविवारचा सुटीचा दिवस असल्याने भाविकांनी सायंकाळी पाच वाजेनंतर रस्त्यांवर गर्दी केली. सायंकाळी शहराच्या मध्यवर्ती भागात अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, शालिमारसह सर्व उपनगरांमधील बाजारपेठा फुलून गेल्या. रामोत्सवासाठी घराघरातून मिठाई, पूजेचे साहित्य, हार-फुले आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली. परिणामी, मध्यवर्ती भागासह सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. शहरात कॉलेजरोड, गंगापूररोड आणि शरणपूर रोडवरही नागरिकांची गर्दी होती.
मंदिरांमध्ये रोषणाई
शहरातील सर्व मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरांच्या आवारात रविवारी रात्रीही स्वच्छता करण्यात आली. भाविकांनीही सुटीचे औचित्य साधत मंदिरांमध्ये रांगा लावल्या होत्या.