आरोग्य केंद्रे बंद करून मंदिरं उघडू का, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भाजपचा सवाल

हायलाइट्स:

  • मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा सुरूच
  • डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का?; भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
  • देवालयं बंद करून सरकारनं शवालयं उघडलीत! – आशिष शेलार

मुंबई: ‘आरोग्य केंद्र बंद करून राज्यातील मंदिरं उघडू का,’ असा टोकदार सवाल विरोधकांना करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपनं आता प्रतिसवाल केला आहे. ‘राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का?,’ असा सडेतोड सवाल भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे. (BJP on Reopening Temples)

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्ष टोला हाणला होता. राज्यातील धार्मिक स्थळं उघडली गेली पाहिजेत हे ठीक आहे. पण त्यापेक्षा आज आरोग्य केंद्रांची गरज आहे. आम्ही ही आरोग्य मंदिरं सध्या उघडत आहोत,’ असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शेलार यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.

वाचा: गोव्यात भाजप पुन्हा येईल; फडणवीसांना ठाम विश्वास

‘मंदिरं आणि आरोग्य मंदिरं या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता दाखवताहेत. राज्यात सुरू असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. कट कमिशन आणि वाटाघाटी हा तुमच्या सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सॅनिटायझर वाटप, सॅनिटायझेशन या सगळ्याच्या पुरवठ्यात कट कमिशनची प्रकरण समोर येतायत. त्यावर तुम्ही कधी भाष्य करणार,’ असा सवाल शेलार यांनी केला.

वाचा: चित्रा वाघ-मेहबूब शेख यांच्यातील वाद थांबेचना; आता वाघ म्हणाल्या…

‘पब, रेस्टाँरंट, डिस्को, बार यांचे मालक यांच्याशी वाटाघाटी होतात आणि नंतर हे सगळं खुलं केलं जातं. कट कमिशनच्या आधारे सरकार निर्णय घेतं का? एक्साइजची कमाई हवी म्हणून दारूची दुकानं उघडी केलीत, मॉल मधल्या कामगारांचं कारण सांगून मॉल उघडे केलेत, मग मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धूप, फुलं विकणारे यांची उपासमार दिसत नाही? त्यांना जगण्याचा अधिकार नाही? मंदिरात किती लोक आले पाहिजेत याबद्दल करोनाचे नियम करून परवानगी दिली जाऊ शकत नाही का? पण ते होणार नाही, कारण हा गरीब माणूस सरकारच्या वाटाघाटीच्या अपेक्षा काय पूर्ण करू शकत नाही,’ असा आरोप शेलार यांनी केला. ‘आरोग्य केंद्रे हवीच, पण कट कमिशनवर नको, ही आमची भूमिका आहे. भक्त आणि देव यांची ताटातूट करण्याचं काम शिवसेना करतेय. मग गोविंदा असेल, गणेशोत्सव असेल नवरात्र असेल, मंदिर असतील. नियमात राहून सुरू करू ही भूमिका का घेतली जात नाही? हा करोना बंदीचा कार्यक्रम नाही तर हे शिवसेनेचं देऊळ बंदीचं अभियान आहे,’ अशी टीका शेलार यांनी केली.

देवालयं बंद करून तुम्ही शवालयं उघडलीत!

ठाणे जिल्ह्यात आदिवासी पाड्यांमध्ये मागच्या सहा महिन्यात ७४१ बालकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. महापालिकेच्या रुग्णालयात उंदरानं डोळा कुरतडल्यानं मृत्यू होतो. मृतदेहांच्या बाजून जिवंत माणसावर उपचार केले जातात, कोविड सेंटरच्या शौचालयात लोक मरतात ही राज्यातील आरोग्याची स्थिती आहे. आरोग्य केंद्रांच्या बाता मारणाऱ्या सरकारनं देवालयं बंद करून एका अर्थानं राज्यभर शवालयं उघडली आहेत,’ अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

Source link

ashish shelarAshish Shelar Questions CM Uddhav ThackerayBJP on Reopening TemplesUddhav Thackerayआशिष शेलारउद्धव ठाकरे
Comments (0)
Add Comment