अजित पवार कोल्हापूर दौरा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज कोल्हापुरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा किमान दहा दिवस चालावा यासाठी प्रयत्न करत असून यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्या आहेत तसेच काळमवाडी धरणाच्या गळतीचे काम पावसाळ्याच्या आत पूर्ण करावा लागणार आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी विविध राजकीय प्रश्नांना उत्तरे दिली.
मी आणि देवेंद्रजी तसेच एकनाथराव तिघे मिळून भुजबळ यांच्याशी बोलू
तसेच मराठा आरक्षण संदर्भात भुजबळ यांचा विरोध मोठ्या प्रमाणात होत असून या संदर्भात प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. भुजबळ यांची भूमिका वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काही संबंध नाही असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या माध्यमातून आणि सरकारमध्ये काम करत असताना सर्व घटकांना न्याय देता आला पाहिजे. कोणत्याही घटकाला नाराज ठेवून चालत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठा आरक्षण आम्हीच देणार. यामध्ये सरकारची कोणतीही मिलीभगत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. एकनाथ शिंदे यांनी एक भूमिका घेतली आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार हे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. घरातील दोन भावांमध्ये देखील वाद होतात मात्र त्यावर बसून मार्ग काढतात. मी, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलू. त्यांचीही भूमिका जाणून घेऊ कुणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नाही असे अजित पवार म्हणाले आहेत.
त्याचवेळी मला सोबत घ्यायचं की नाही, ते पक्षाने ठरवावं, भुजबळांच्या या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, भुजबळांशी बोलून आमचं आम्ही काय ते ठरवू. तुम्ही (प्रसार माध्यमांनी) जास्त विचार करू नका.
वाचाळवीरांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही
दरम्यान आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील गंगावेस तालीम येथे भेट दिली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमच्या सुद्धा तालमीत अजित पवार यांनी यावं असं म्हटलं. त्यावर मी विकास कामे करणारा माणूस आहे. वाचाळवीरांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही, असे अजित पवार यांनी सुनावले.
श्री महालक्ष्मीचा आराखडा तयार करण्यात आलाय, काही कठोर निर्णय घ्यावे लागतील
शाहू मिल येथे भव्य राजर्षी शाहू स्मारक करायचं नियोजन आहे. मात्र काही कारणास्तव हे काम थांबले आहे. या संदर्भात देखील लवकरात लवकर पाठपुरावा करून काम सुरू करू असे अजित पवार यांनी सांगितले. सोबत श्री महालक्ष्मीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासंदर्भात काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. कारण पूर्वीच्या काळात भाविकांची आणि वाहनांची संख्या कमी होती. मात्र आता भाविकांची संख्या वाढल्याने जागा अपुरी पडत आहे. यामुळे मंदिर परिसरातील जागा घेण्याची गरज असून यासंदर्भात चर्चा सुरू आहेत. याबाबतीत परिसरातील नागरिकांचं पूर्णपणे सहकार्य घेत, त्यांना विश्वासात घेऊन सुधारणा व पुनर्वसन केले पाहिजे. या संदर्भात सूचना दिल्या असल्याचेही अजित पवार म्हणाले आहेत.