या प्रश्नी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेत ही कंटेनर शाखा हटवण्याची मागणी केळकर यांनी केली आहे. अन्यथा त्याशेजारीच प्रतिकात्मक दोन कार्यालये थाटण्याचा इशाराही त्यांनी दिल्याने येत्या काळात ठाण्यात ‘कंटेनर शाखां’वरून वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
धर्मवीरनगर येथील तुळशीधाम भागात ठाणे महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचे फोटो भाजप आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. २०२१ साली याच जागेवर कपाऊंड टाकून लोकोपयोगी मूलभूत सोयी सुविधांसाठी वापर करण्याची सूचना केली होती.
पालिकेनेही या ठिकाणी स्वतःचा फलक लावून अतिक्रमण न करण्याचे निर्देश दिले होते. तरीही २४ जानेवारी रोजी या ठिकाणी भलामोठा कंटेनर ठेवून २७ जानेवारी रोजी त्या कंटेनरवर झेंडा व फलक लावल्याचे केळकर यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना निदर्शनास आणून दिले. या प्रकारानंतर आयुक्तांनी तत्काळ संबंधितांशी संपर्क साधून कारवाईचे आदेश दिल्याचे केळकर यांनी सांगितले.
हिंमतच कशी होते? केळकरांचा सवाल
शहरातील विविध भागात राजरोसपणे अतिक्रमण करण्याची इतकी हिंमत होतेच कशी? तेव्हा, तातडीने ही अनधिकृत कंटेनर शाखा हटवावी, अन्यथा या ठिकाणी दोन प्रतिकात्मक कार्यालये थाटण्याचा इशारा आमदार केळकर यांनी दिला आहे. शहरात तुळशीधामप्रमाणे शिवाईनगर, घोडबंदर रोड, सुभाषनगर येथेही रस्त्याच्या कडेला पदपथावर या कंटेनर शाखा उभारण्यात आल्या असून मीरा – भाईंदरमध्येही या शाखांचा वाद काही दिवसांपूर्वी उफाळून आला होता.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News