महाविकास आघाडीनं राज्यातील ४८ पैकी जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्यासाठी रणनीती आखली आहे. मविआचं जागा वाटप करताना ज्यांचा उमेदवार विजयी होऊ शकतो त्यांना ती जागा मिळेल या निकषावर करण्यात येणार होतं. त्यानुसार आतापर्यंत ३४ जागांचा तिढा सुटला आहे. उर्वरित १४ जागांवरील तिढा सोडवण्यासाठी उद्या बैठक होणार आहे.
कोणत्या मतदारसंघांचा तिढा कायम?
महाविकास आघाडीत वर्धा, रामटेक, भिवंडी, हिंगोली, जालना, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्ये, मुंबई दक्षिण मध्य, शिर्डी यासह इतर मतदारसंघांचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
महाविकास आघाडीच्या जाग वाटपात काँग्रेसला २० ते २२ जागा हव्या आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ६ ते ८ जागा, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला १८ ते २० जागा मिळू शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यानं वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडी किंवा मविआत सहभागी झाल्यास त्यांना काँग्रेसकडून काही जागा सोडाव्या लागू शकतात, असं नाव न छापण्याच्या अटीवर म्हटलं असल्याचं वृत्त द न्यू इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या वेबसाइटनं दिलं आहे. शिवसेना ठाकरे गट त्यांच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासाठी जागा सोडण्याची शक्यता आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित होणार का हे पाहावं लागणार आहे.