हायलाइट्स:
- ज्योतिषशास्त्र विषयावर बंदी घाला
- अनिसचे हरीश केदार यांची मागणी
- ज्योतिषशास्त्र हा विषय सुरू करू नये कारण…
अमरावती : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ignou मार्फत घेण्यात येणारा ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमाला कडकडून विरोध करण्यात येत आहे. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना चांदुर रेल्वे तहसीलदार मार्फत निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये इग्नू ( इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ) यांचा ज्योतिषशास्त्र हा विषय सुरू करू नये कारण महाराष्ट्राला संतांची आणि समाज सुधारकांची शेकडो वर्षाची परंपरा लाभलेली आहे.
संत चक्रधर स्वामी पासून ते थेट संत गाडगे महाराजापर्यंत प्रबोधनाची परंपरा आहे. तर दुसऱ्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुलेंपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते प्रबोधनकार ठाकरेपर्यंत समाज सुधारक होऊन गेलेत त्यांची परंपरा चालू ठेवणे, हे प्रत्येक महाराष्ट्रातील सुज्ञ युवकाचे कर्तव्य आहे.
अशावेळी इग्नू तर्फे यंदाच्या वर्षापासून ज्योतिष या विषयात पदविका हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. खगोल शास्त्रज्ञ ज्योतिषाला मान्यता देत नाहीत. जगभरातील १८६ वैज्ञानिकांनी ज्यात १८ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत फलज्योतिष हे शास्त्र नाही, ते केवळ काही लोकांचा पोट भरण्याचा धंदा आहे. त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये असे पत्रक काढले. त्यात डॉ. सी चंद्रशेखर या भारतीय शास्त्रज्ञाचा ही समावेश आहे. ज्योतिषाचा अभ्यासक्रम सुरू करणे म्हणजे लोकांना अंधश्रद्धेच्या दरीत लोटण्यासारखे आहे.
समाज विज्ञानाच्या दिशेने जाण्याऐवजी अज्ञानाच्या दिशेने ढकलला जाईल, हे थांबवण्यासाठी आपण इग्नूच्या ज्योतिष शास्त्र या अभ्यासक्रमाला मान्यता देऊ नये ही विनंती तहसीलदार साहेबांना केली आहे.