हायलाइट्स:
- राज्यात नव्या बाधित रुग्णांची संख्या ४ हजारांहून कमी
- आज ३,२४० रुग्ण बरे होऊन घरी परतले
- राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के
मुंबई : करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्या बाधित रुग्णांची संख्या ४ हजारांहून कमी आढळत असल्याचं चित्र आहे. आजही राज्यात ३,५९५ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे.
राज्यात आज ३,२४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,२०,३१० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०६ टक्के एवढं झालं आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात आज ४५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६५,२९,८८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,११,५२५(११.५२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८९,४२५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९०८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, राज्यातील नव्या करोना रुग्णांचा आलेख ढासळलेला असला तरीही सण-उत्सवांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात हालचाल झाली आहे. अनेकजण गणेशोत्सवासाठी शहरातून गावाकडे गेले आहेत. या पार्श्वभूमीवर करोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. काही जिल्ह्यांमध्ये उत्सव काळात जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.