हायलाइट्स:
- पुण्यातील कार्यक्रमात राज्यपालांची फटकेबाजी
- पंतप्रधान मोदींचं केलं तोंडभरून कौतुक
- शिवनेरी किल्ल्याबाबतचाही सांगितला किस्सा
पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अहर्निश काम करत असून, गेल्या सात वर्षांत केंद्रात भ्रष्टाचार झाल्याचे कधीही ऐकलेलं नाही, कारण केंद्रातील चांगल्या नेतृत्वामुळे देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे,’ अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी पंतप्रधानांवर स्तुतीसुमने उधळली. ‘लोकमान्य टिळकांचे स्वराज्याचे स्वप्न आपण पूर्ण केले असून, आता महात्मा गांधींचे रामराज्य आणण्यासाठी दररोज दीन-दुबळ्या गरीबांची सेवा करा,’ असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं आहे.
भारत विकास परिषदेच्या शिवाजीनगर शाखेच्या वतीने राज्यपालांच्या हस्ते शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या आयुर्वेदिक रुग्णालयाला प्राणवायू निर्मिती यंत्रणा (ऑक्सिजन जनरेशन प्लांट) प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री श्याम शर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महापौर मुरलीधर मोहोळ, ट्रस्टचे अध्यक्ष गोपाळ राठी आदी उपस्थित होते.
‘करोनासारख्या आपत्तीच्या काळात अनेक संस्थांनी मदतकार्य राबवलं. मात्र, भारत विकास परिषद आणि ताराचंद रामनाथ चॅरिटेबल ट्रस्टसारख्या संस्था सामान्य काळ ते संकटकाळ सदैव सेवाभावी वृत्तीने काम करतात,’ असं नमूद करत राज्यपालांनी प्राणवायू निर्मिती यंत्रणा उभारल्याबद्दल परिषद व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं. परिषदेचे कार्यकर्ते दत्ताजी चितळे यांनी प्रास्ताविक केलं, तर राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केलं.
शिवनेरी चढाईनंतर पंतप्रधानांचा फोन
‘माझे वय ८० असले, तरी शिवनेरी किल्ल्यावर चढून जाणे कठीण असल्याचे मी मानत नाही. मी शिवनेरीवर जाऊन आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून माझे अभिनंदन केले. आपल्या देशाचा पंतप्रधान बारीकसारीक गोष्टींवरही लक्ष ठेवून आहे, हे आपलं भाग्य आहे,’ असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. ‘जगात ज्यांना दुष्टपणे वागायचे आहे, ते देखील आज घाबरलेले असून, देशाच्या साहसामुळे त्यांची हिंमत होत नाही,’ असंही ते म्हणाले.