‘रामदास कदम यांनी ठाकरे सरकार अस्थिर करण्याचे काम केले’; मनसे नेत्याचा गंभीर आरोप

हायलाइट्स:

  • खेडमध्ये पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोप
  • रामदास कदमांनीच महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा मनसेचा आरोप
  • कदम यांनीही केला पलटवार

खेड :शिवसेना आणि मनसेत पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांची सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केलं आहे, असा गंभीर आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

‘परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याबाबतची माहिती रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली मिळवून भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिली,’ असा खळबळजनक दावा वैभव खेडेकर यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. वैभव खेडेकर यांच्या विधानाने कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून रामदास कदम हे शिवसेनेचे नेते असताना महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील खेडेकर म्हणाले.

कोल्हापुरात भाजप-राष्ट्रवादी संघर्षाची चिन्हे; सोमय्या यांना राष्ट्रवादी अडवणार!

रामदास कदम यांचे मित्र किरीट सोमय्या यांनी रामदास कदम यांची देखील बेनामी संपत्तीची माहिती जगासमोर आणावी, असं आवाहन देखील वैभव खेडेकर यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट बाबत माहिती उघड केली होती, हे रिसॉर्ट मंत्री परब यांनी बेहिशोबी पैशातून बांधले असल्याचा आरोप करत त्यांनी मंत्री पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांसमोर केली होती.

‘मागून वार करणारा मी नाही’

शिवसेना नेते रामदास कदम यांनी वैभव खेडेकर यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘मी वाघासारखा समोरून वार करणारा आहे. अनिल परब हे मंत्री आहेत, त्यामुळे असले आरोप करणाऱ्यांना किंमत नाही,’ असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

दापोलीचा प्रसाद कर्वे हा सेनेचा कार्यकर्ता आहे, हे मला मान्य आहे. पण त्याने माझ्या भावाच्या हॉटेलविरोधातही तक्रार केली होती. तेव्हा त्याला आपण विचारणा केली होती. त्याने केलेली तक्रार हा त्याचा स्वतंत्र विषय आहे. त्याच्याशी माझा काहीएक संबंध नाही, असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

Source link

Ramdas Kadamमनसेरत्नागिरीरामदास कदमशिवसेना
Comments (0)
Add Comment