हायलाइट्स:
- करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात राजेश टोपेंची दिलासादायक माहिती
- गर्दीमुळे करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते
- लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही
जालना : राज्यात गणेशोत्सवासाठी अनेक नियम लागू केले असले तरी थोडी फार तरी गर्दी झालीच होती. त्यामुळे पुन्हा करोना डोकं वर काढणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाहीत असं राजेश टोपे यांनी सांगितली आहे.
महाराष्ट्रात सध्यातरी करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते. परंतु सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते असे असले तरी पण लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही असंही ते म्हणाले.
राज्यात सध्या दररोज १३ ते १४ लाख जणांना लसीकरण करण्यात येत असून डेल्टाची रुग्णसंख्या सध्या राज्यात स्थिर आहे. त्यामुळे नागरिकांनी करोनाच्या नियमांचं पालन करावं असं आवाहनदेखील टोपे यांनी जनतेला केलं. राज्यात दररोज १५ ते २० लाख लसीकरण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असून त्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी फिरत असल्याचं देखील टोपे म्हणाले.