हायलाइट्स:
- दुर्गम भागातील नागरिकांचा उपचारासाठी संघर्ष
- १२ वर्षीय मुलीला खांद्यावर घेऊन तब्बल ३० किलोमीटर करावी लागली पायपीट
- आदिवासी भागातील आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर
गडचिरोली : जिल्ह्यात अजूनही पुरेशा प्रमाणात आरोग्याच्या सुविधा पोहोचल्या नाहीत. परिणामी आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना रुग्णाला उपचारासाठी खांद्यावरच घेऊन जावं लागत आहे. ही हृदयद्रावक परिस्थिती अबुजमाड परिसरातील असून एका १२ वर्षीय मुलीला उपचारासाठी खांद्यावर घेऊन तब्बल ३० किलोमीटर पायपीट करावी लागल्याची घटना समोर आली आहे.
मुरी पांडू पुंगाटी (१२) मेटावाडा, जि-नारायणपूर, छत्तीसगड असं रुग्णाचे नाव असून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा आदिवासी भागातील आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचा सीमावर्ती भागातील हा परिसर अबुझमाड म्हणून ओळखला जातो. या अतिदुर्गम आदिवासीबहुल डोंगराळ भागातील आदिवासींना उपचारासाठी भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय पर्याय नाही. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर छत्तीसगड राज्यातील जवळपासचे आदिवासी बांधव सुद्धा याच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात.
छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील मेटेवाडा आणि गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरीचे अंतर ३० किमी असल्याने या भागातील नागरिकांना उपचारासाठी कठीण परिस्थितीचा सामना करूनही लाहेरीचे अंतर परवडणारे असल्याने या भागातील रूग्ण लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातच दाखल होत असतात.