‘जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, हल्ले, दगडफेक आणि सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराची भीती न बाळगता यंदाची लोकसभा निवडणूक होणार आहे. गेल्या तीन दशकांत फुटीरतावाद्यांनी चालवलेल्या ‘मतदान बहिष्कार’ मोहिमा आता इतिहासजमा झाल्या आहेत’, असे मोदी म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील नागरिकांच्या प्रदीर्घ दु:खाचा अंत करण्याचे आश्वासन आपण पूर्ण केल्याचे सांगत, राज्यघटनेतील कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे आव्हान मोदी यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना दिले.
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हाती घेतलेल्या विकासप्रकल्पांमुळे जम्मू-काश्मीरचा चेहरामोहरा बदलला आहे. येथील नागरिक निराशेकडून आशेकडे वळले आहेत, हा सर्वांत मोठा बदल असल्याचे मोदी म्हणाले.
‘राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नाही’
अयोध्येतील राम मंदिर हा भाजपसाठी निवडणूक मुद्दा असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान मोदी यांनी जोरदार हल्ला चढवला. ‘राम मंदिर हा कधीही निवडणुकीचा मुद्दा नव्हता आणि कधी राहणारही नाही. ही देशातील नागरिकांच्या श्रद्धेची बाब आहे’, असे पंतप्रधान म्हणाले.