निवडणूक रोखे (इलेक्टोरल बाँड) ही एक प्रकारची ‘खंडणी’ असल्याचे सांगत, देशातील काही व्यावसायिकांना धमकावण्याचे डावपेच अवलंबल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.
‘प्रत्येक लहान शहरात किंवा गावात असे काही लोक आहेत, जे शारीरिक इजा पोहोचवण्याची धमकी देऊन पैसे उकळतात. मल्याळममध्ये तुम्ही या खंडणीला ‘कोल्ला आदिक्कल’ म्हणता, पण मोदी त्याला निवडणूक रोखे म्हणतात. सर्वसामान्य चोर जे रस्त्यावर करतात, तेच पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय स्तरावर करत आहेत,’ अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.
वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान, गांधी यांनी आरोप केला, की भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार निवडक व्यावसायिकांना लक्ष्य करण्यासाठी वेगवेगळे डावपेच अवलंबत आहे. पंतप्रधानांनी देशातील काही उद्योगपतींना मदत केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
‘निवडणूक रोख्यांच्या पातळीवर, या धमक्या मोठ्या चपखलपणे दिल्या जातात. ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाचे लोक येतील, चौकशी करतील आणि शेवटी म्हणतील तुम्ही ते (त्यांचा व्यवसाय) अदानींना का देत नाही? अशाप्रकारे अदानींनी आधीच्या मालकाकडून मुंबई विमानतळ मिळवले,’ असा आरोपही राहुल यांनी केला. अशा ‘धमकी’च्या डावपेचांमुळे उद्योगपतींनी भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे दिले.
कोझिकोड जिल्ह्यातील कोडियाथूर येथे रोड शोमध्ये निवडणूक रोख्यांच्या संदर्भात पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच घेतलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत राहुल म्हणाले, ‘त्यांच्या मुलाखतीत, ते पृथ्वीवरील सर्वात मोठ्या भ्रष्टाचार घोटाळ्याचा, निवडणूक रोखे, ज्याद्वारे भाजपला भारतीय व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपये मिळाले, त्या योजनेचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत,’ यानंतर, आणखी एका रोड शोमध्ये गांधींनी आरोप केला की, ‘मोदी सरकारला देश कसा चालवायचा हे समजत नाही.’
मोदींचे काम हे नागरिकांचे लक्ष महत्त्वाच्या मुद्द्यांवरून वळवणे, श्रीमंत उद्योगपतींचे संरक्षण करणे आणि त्यांची बँक कर्जे माफ करणे हे आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. यावेळी कोणाचेही नाव न घेता, मोदी हे भारतातील पाच ते सहा सर्वात श्रीमंत उद्योगपतींना मदत करीत असल्याचा आरोप केला. मोदींनी देशातील २०-२५ लोकांच्या हाती सुमारे १६ लाख कोटी रुपयांची संपत्ती दिल्याचा आरोपही राहुल यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले…
– देशातील शेतकरी ज्या समस्यांना तोंड देत आहेत, त्याबद्दल मोदी बोलत नाहीत. बेरोजगारी, महागाई यावरही ते काहीच बोलत नाहीत
– मोदी देशातील निवडक श्रीमंतांचा हाती पैसे देत आहेत, मात्र काँग्रेसने सत्तेत आल्यानंतर गरिबांच्या हाती पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे.
– देशातील प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला वर्षाला एक लाख रुपये देण्यात येतील
– प्रत्येक पदवीधर किंवा पदविकाधारकाला पगारासह एक वर्षाची इंटर्नशिप देणे बंधनकारक करणारा कायदा करणार