राजस्थानच्या रणसंग्रामात ‘गदर-३’मुळे रंगत, बाडमेर-जसैलमेरमधील तिरंगी लढतीकडे देशाचं लक्ष

बाडमेर (राजस्थान) : हातपंप उखडून फेकणारा ‘तारासिंग’ ‘गदर’ आणि ‘गदर-२’ या सिनेमात पाहिला होता. ‘गदर’मध्ये गाजलेला हातपंप राजस्थानातील एका मतदारसंघातही चर्चेत आहे. क्षेत्रफळानुसार देशातील सर्वांत मोठ्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या या मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना भिडण्यासाठी अपक्ष रवींद्रसिंह भाटी मैदानात उभा ठाकला आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी, काँग्रेसचे उम्मेदाराम बेनिवाल मैदानात आहेत. अवघ्या २६ वर्षांच्या रवींद्रसिंहने ‘सोशल मीडिया’चा प्रभावी वापर करून स्थानिकसह राष्ट्रीय माध्यमांना स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले आहे.

हातपंपाचा इतिहास काय आहे?

या मतदारसंघातून रवींद्रसिंह कोणत्या खुन्नसने मैदानात उतरला, याची कहाणीही अतिशय रंजक आहे. गेल्या वर्षी राजस्थानात झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिव या विधानसभा मतदारसंघातून रवींद्रसिंह भाटी मैदानात उतरला होता. त्या वेळी भाजपचे स्वरूपसिंह खारा, काँग्रेसचे अमीन खान आणि आणखी एक अपक्ष उमेदवार फतेह खान या मतदारसंघातून भाटीविरोधात लढले. यामध्ये भाटी विजयी झाला. भाजपमध्ये गेलेल्या भाटी याने पक्षातून बाहेर पडून बंडखोरी केली आणि विजय मिळवला. भाटी आमदार झाला. आपल्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी धडपड करू लागला. शिव मतदारसंघात पाण्याची असलेली समस्या सोडविण्यासाठी काही हातपंपाची मागणी त्याने नवनिर्वाचित भाजप सरकारकडे केली. मात्र, रवींद्रसिंह भाटी आमदार असूनही त्याला केवळ दोन हातपंप मंजूर झाले. मात्र, त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या भाजपच्या स्वरूपसिंह यांना जलसंपदा विभागाने तब्बल २० हातपंप मंजूर केले. आपला आमदार आपल्या मतदारसंघात काम करीत नाही, अशी इथल्या नागरिकांची धारणा झाली. त्याची अद्दल भाजपला घडावी म्हणून खुन्नस म्हणून रवींद्रसिंह भाटी लोकसभेच्या मैदानात उभे राहिला आहे, असे बाडमेरमधील स्थानिक पत्रकार सांगतात. त्यामुळे हातपंपावरून पेटलेल्या या राजकीय लढाईला गमतीने ‘गदर-३’ म्हटले तर ते वावगे ठरू नये.
राजस्थान: सरकारी योजना उदंड, पण सीमेवर मात्र वानवा; निवडणुकीनंतर उमेदवार गायब, मतदार वाऱ्यावर
सोशल मीडियाचा प्रभावी वापर

जैसलमेर आणि बाडमेर या दोन्ही शहरांमध्ये फिरल्यावर सगळीकडे चौधरी, उम्मेदाराम आणि भाटी यांचे प्रचारफलक लक्ष वेधून घेतात. मात्र, या प्रचारामध्ये रवींद्रसिंह भाटीच्या ‘रील्स’ आणि ‘यू ट्यूब’वरील व्हिडिओंनी धुमाकूळ घातला आहे. शिवाय रवींद्रसिंह यांच्या डिजिटल प्रचाररथांवर त्यांचा प्रचार करणारी गाणी लावली जातात, तर दुसरीकडे त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ ‘व्हायरल’ केले जातात.

मुख्यमंत्र्यांची इच्छा होती मात्र दोन आमदार आणि एका खासदारांमुळे मला डावलले : विनोद पाटील

भाजप, काँग्रेसचाही दावा

राजपूत समाजाचा असणारा रवींद्रसिंह भाटी आणि त्याविरोधात कैलाश चौधरी आणि उम्मेदाराम असे जाट उमेदवार असे या लोकसभेचे राजकीय गणित आहे. राजपूत समाज भाजपच्या विरोधात असल्याचे इथे बोलले जाते. दुसरीकडे अल्पसंख्याक आणि ओबीसींची मते काँग्रेसला जात असल्यामुळे भाजपला कोणत्या माध्यमातून मते मिळणार, हा इथला कळीचा मुद्दा आहे. भाजप आणि काँग्रेस या दोघांनीही येथे आम्हीच जिंकणार असा दावा केला आहे. मात्र, या तिरंगी लढतीत भाजप आणि रवींद्रसिंहच्या भांडणात ‘तिसऱ्या’चा अर्थात काँग्रेसचा लाभ होण्याची शक्यता काही जणांनी व्यक्त केली.

Source link

barmer jasailmer lok sabha electionslok sabha elections 2024Rajasthan Electionsravindrasinghsocial media
Comments (0)
Add Comment