निवडणुकीच्या प्रचारात नवा वादंग! वारसा करावरुन शब्दयुद्ध, पित्रोदा यांच्याकडून अमेरिकी कायद्याचा दाखला

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : मंगळसूत्राबाबत पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी देशातील संपत्तीच्या वाटपाबाबत अमेरिकेतील वारसा कराची वकिली केल्याने बुधवारी नवा वादंग निर्माण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने बचावात्मक पवित्रा घेतलेल्या काँग्रेसने पित्रोदा यांच्या विधानाबाबत हात झटकले.‘इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष असलेल्या सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेप्रमाणेच भारतात वारसा कर लागू करण्याचे सुतोवाच केले. लोकसभा निवडणुकीदरम्यान संपत्ती फेरवाटप योजनेबाबत काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन करताना पित्रोदा यांनी भारतातही वारसा कर लावला पाहिजे, असा सूर आळवला.

याबाबत पित्रोदा यांची चित्रफीत सर्वत्र पसरल्यानंतर भाजपच्या तोफा धडाडू लागल्या. ‘काँग्रेसने ठरवलेच आहे की, त्यांना देश उद्ध्वस्त करायचा आहे,’ असा हल्लाबोल भाजपच्या आयटी शाखेचे प्रमुख अमित मालवीय यांनी चढवला. ‘काँग्रेसचे सॅम पित्रोदा आता देशवासीयांच्या संपत्तीच्या फेरवाटपासाठी ५० टक्के वारसा कराची वकिली करीत आहेत. याचा अर्थच असा, की आम्ही (भारतीयांनी) जे काही आमच्या मेहनतीने आणि उद्यमशीलतेतून उभारले आहे, त्यातील ५० टक्के काढून घेतले जाईल. काँग्रेस जिंकल्यास आम्ही जे काही कर भरतो तोही वाढवतील. ही संपत्ती काँग्रेस कोणाला वाटून टाकणार हेही स्पष्ट झालेच आहे,’ असे मालवीय म्हणाले.
‘जे निवडणूक जिंकू शकत नाहीत…’, PM मोदींनी सोनिया गांधींवर सोडले टीकास्त्र, म्हणाले…
पित्रोदा यांच्या वक्तव्याबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी हात झटकले. ‘पित्रोदा हे माझ्यासह जगभरातील अनेक लोकांचे गुरु, मित्र, तत्त्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहेत. त्यांचे म्हणणे संदर्भ सोडून पाहणे म्हणजे नरेंद्र मोदींच्या द्वेषपूर्ण आणि खोडसाळ निवडणूक प्रचारापासून लक्ष विचलित करण्याचा भाजपचा हेतुपुरस्सर आणि हताश प्रयत्न आहे,’ असे जयराम रमेश म्हणाले. वारसा कर लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे रमेश यांनी स्पष्ट केले. तत्कालीन अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी वारसा कर लागू करण्याची भूमिका मांडली होती. मोदी सरकारच वारसा कराबाबत अनुकूल भूमिका घेत असल्याचा आरोप रमेश यांनी केला.

उद्धव ठाकरेंना मुलाशिवाय काहीच दिसत नाही; अमित शाहांचा टोला, शरद पवारांनाही थेट सवाल

दरम्यान, हे आपले वैयक्तिक मत असून, त्याचा पक्षाशी संबंध नसल्याचा खुलासा पित्रोदा यांनी केला. हे धोरण पक्षाने स्वीकारलेच पाहिजे, असेही नव्हे, असे पित्रोदा म्हणाले. याआधी पित्रोदा यांनी निवडणुकीच्याच तोंडावर दिल्लीतील शीख हत्याकांडाबाबत, ‘हुवा तो हुवा’ असे वादग्रस्त विधान केले होते. त्या वेळीही ते भाजपला प्रचारात फायदेशीर ठरले होते.

अमेरिकेत वारसा करामुळे तेथील सरकारला एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या ५५ टक्के संपत्तीवर दावा करण्याचा अधिकार आहे. धनवंताने जगाचा निरोप घेतल्यानंतर संपत्तीचा काही भाग जनतेसाठी सोडणे, हे अगदी योग्य आहे. पण, हे माझे वैयक्तिक मत आहे. – सॅम पित्रोदा, अध्यक्ष, इंडियन ओवरसीज काँग्रेस

Source link

bjp vs congressinheritance taxlok sabha elections 2024sam pitroda remarkवारसा कर
Comments (0)
Add Comment