हायलाइट्स:
- दाम्पत्याने सात जणांना ५२ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातला
- स्वस्तात सोने खरेदीचं दाखवलं होतं आमिष
- पोलिसांनी आरोपी पती-पत्नीवर दाखल केला गुन्हा
सांगली : स्वस्तात सोने खरेदी करून देण्याच्या आमिषाने सांगली जिल्ह्यात एका दाम्पत्याने सात जणांना ५२ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भास्कर तात्यासो मुळीक (वय ६५) यांनी शनिवारी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गंडा घालणाऱ्या बंटी-बबली विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विराज विजय कोकणे आणि दीपाली विराज कोकणे (दोघे रा. संभाजी कॉलनी, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी भास्कर मुळीक यांचा पानपट्टीचा व्यवसाय आहे. ते सांगलीतील पत्रकारनगरमध्ये आपल्या कुटुंबियांसह राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांची संभाजीनगर येथील कोकणे पती-पत्नीशी ओळख झाली होती. या ओळखीतून कोकणे दाम्पत्याने मुळीक यांना स्वस्तात सोने देण्याचं आमिष दाखवलं. यासाठी त्यांच्याकडून आठ लाख रुपये घेतले होते. तसंच मुळीक यांच्या ओळखीतील इतर सहा जणांकडून त्यांनी लाखो रुपये उकळले. यात तानंग येथील दत्ता पाटील यांच्याकडून पाच लाख रुपये, सांगलीतील अमित पाटील यांच्याकडून ४ लाख ३० हजार रुपये, सांगलीतील संतोष सोलापुरे यांचे १० लाख ८० हजार रुपये, महावीर आलासे यांचे १४ लाख रुपये, तसेच कुमठे येथील विश्वास सावंत, विजयनगर येथील प्रकाश पाटील अशा एकूण सात जणांकडून कोकणे दाम्पत्याने ५२ लाख ९० हजार रुपये उकळले. हा प्रकार एप्रिल २०२१ ते १५ जुलै २०२१ या कालावधीत घडला.
पैसे घेऊनही सोने मिळत नसल्याने सात जणांनी कोकणे पती-पत्नीकडे तगादा लावला. त्यावेळी या दोघांनीही सोने आणि पैसे देण्यास टाळाटाळ केली. अनेक महिने उलटले तरी दिलेले पैसे किंवा त्याबदल्यात सोने मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच भास्कर मुळीक यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या कोकणे दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.