प्रसाद यांनी चामराजनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून सहा वेळा नेतृत्व केले आहे. तर म्हैसूर जिल्ह्यातील नंजनगुडचे ते दोन वेळा आमदार राहिलेले आहेत.
व्ही श्रीनिवास प्रसाद काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, “ज्येष्ठ नेते आणि चामराजनगरचे खासदार श्री व्ही. श्रीनिवास प्रसाद जी यांच्या निधनाने मला अतीव दुःख झाले आहे. ते सामाजिक न्याय व्यवस्थेत निपुण होते, गरीब, दलित आणि उपेक्षितांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले होते.” अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या आहेत.
“विविध स्तरातील समाज सेवेसाठी ते अत्यंत लोकप्रिय होते. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या प्रती मी शोक व्यक्त करतो. ओम शांती,” असे मोदी यांनी एक्सवर लिहिले आहे.
या वर्षी १८ मार्च रोजी, प्रसाद यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषण केली. त्यांच्या सार्वजनिक सेवेला यावेळी ५० वर्षे पूर्ण झाली.
त्यांनी १९७६ मध्ये पूर्वीच्या जनता पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली आणि १९७९ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी जेडी(एस), जेडी(यू) आणि समता पक्षातही काम केले होते.
प्रसाद यांनी १९९९ ते २००४ या काळात अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री म्हणून काम केले. ते नंतर काँग्रेसमध्ये सहभागी झाले, २०१३ मध्ये आमदार म्हणून निवडून आले आणि सिद्धरामय्या सरकारमध्ये महसूल मंत्री झाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
२०१६ मध्ये, प्रसाद यांनी कर्नाटक विधानसभेचा राजीनामा दिला आणि पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. २०१७ ची नांजनगुड पोटनिवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढवली पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये चामराजनगरमधून लोकसभेची निवडणूक यशस्वीपणे लढवली.