मटा ग्राउंड रिपोर्ट: बडोद्यात ‘एक मराठा’ नाहीच; भाजपचे हेमांग जोशी विरुद्ध कॉंग्रेसचे पढियार

महेश पठाडे, बडोदा : एकेकाळी मुंबई प्रांतातील महत्त्वाचे संस्थान बडोदा होते. या संस्थानाची राजधानी बडोदा होती, जेथे महाराजा सयाजीराव गायकवाड (तृतीय) घराण्याचे राज्य होते. मराठाबहुल बडोद्यात स्वातंत्र्यानंतर १९५२पासून आतापर्यंत पाच मराठ्यांनी संसदेत प्रतिनिधित्व केले. मात्र, आता मराठ्यांचे प्राबल्य असूनही येथे जातीय समीकरणे बदलली आहेत. भाजपचे तरुण उमेदवार हेमांग जोशी यांच्याविरुद्ध काँग्रेसचे जशपालसिंह महेंद्रसिंह पढियार असा प्रमुख सामना रंगत आहे. भाजपविरोधात क्षत्रिय समाज एकवटल्याने संघटनात्मक पातळीवर संपुष्टात आलेल्या काँग्रेसने क्षत्रिय समाजाला उमेदवारी दिली आहे. भाजपची भिस्त बडोद्यातही मोदी कार्डावरच असल्याचे चित्र आहे.

बडोद्यात मराठा समाजाचे प्राबल्य असले, तरी जातीय समीकरणे आता बदलली आहेत. यापूर्वी गायकवाड घराण्यातील फत्तेसिंहराव गायकवाड यांनी १९५७, १९६२, १९६७; तर रणजितसिंह गायकवाड यांनी १९८०, १९८४ मध्ये बडोद्याचे प्रतिनिधित्व केले होते. काँग्रेसचे सत्यजित गायकवाड यांनी १९९६मध्ये विजय मिळवला. त्यानंतर मराठा समाजाचे नेतृत्व पुढे आले नाही. भाजपचे बाळकृष्ण शुक्ल यांनी २००९मध्ये खासदारकी भूषवली. शुक्ल मराठी ब्राह्मण. मराठी माणसाने प्रतिनिधित्व केलेले ते शेवटचे खासदार. नंतर नरेंद्र मोदी यांनी २०१४मध्ये वाराणसी आणि बडोद्यातून विजय मिळवला. त्या वेळी वाराणसीची जागा राखताना बडोद्याची जागा सोडली. तेथे रंजनबेन भट्ट यांनी दोन वेळा विजय मिळवला. आता हेमांग जोशी उमेदवारी करीत आहेत. हेमांग जोशी महापालिका शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष होते. स्थानिक राजकारणात त्यांचे कुठेही नाव नव्हते. शैलेश सोट्टा, बाळकृष्ण शुक्ल यांच्यासारख्या दिग्गजांना डावलून हेमांग यांना उमेदवारी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अर्थात, बडोदा आता भगवा झाला आहे. उमेदवारापेक्षा मोदींचे नाव पुरेसे आहे. मोदींच्याच नावाखाली जोशी मतांचा जोगवा मागत आहेत.

काँग्रेसचे जातीचे समीकरण

काँग्रेसने बडोद्यात ७०-८० च्या दशकातील ‘खाम’ (केएचएएम) सूत्र पुन्हा वापरण्याची खेळी केली आहे. खाम म्हणजे क्षत्रिय, हरिजन, आदिवासी, मुस्लिम. सध्या गुजरातमध्ये क्षत्रियांचा भाजपवर कमालीचा रोष आहे. केंद्रीय मंत्री व राजकोटचे उमेदवार पुरुषोत्तम रूपाला यांनी क्षत्रियांविरुद्ध वादग्रस्त विधान केले. त्यानंतर क्षत्रियांचे आंदोलन उग्र होत आहे. दुसरे म्हणजे भाजपच्या मुस्लिमद्वेषी राजकारणाचा फायदा उचलून काँग्रेसने ‘खाम’ सूत्र पुन्हा आणले आहे. मात्र, काँग्रेसचे बडोद्यातील संघटन क्षीण आहे. काँग्रेसचे खासदार राहिलेले सत्यजित गायकवाड यांनीही पक्षातील अंतर्गत हेवेदाव्यांमुळे अंग काढून घेतले आहे. संघटनच नसल्याने इथे रिक्षाचालकापासून प्रत्येक घटकातील मतदार ‘आएगा तो मोदी ही’ असेच म्हणतो. अनेकांना काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव माहिती नाही. त्यामुळे क्षत्रिय उमेदवाराचा काँग्रेसला कितपत फायदा होतो, याबाबत राजकीय तज्ज्ञ साशंक आहेत.

गायकवाड घराणे आता भाजपकडे

गायकवाड घराणे १९८५पर्यंत काँग्रेसच्या बाजूने होते. काँग्रेस काळात मराठी माणसांचे प्राबल्य जास्त होते. आता या घराण्याचा कल भाजपकडे अधिक झुकला आहे. मराठी व गुजराती दोन्ही समाज भाजपकडे गेले आहेत. हेमांग यांची स्थानिक स्तरावर फारशी ओळख नाही. त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर दीडशे मतेही मिळतील की नाही, अशी शंका स्थानिक नागरिक उपस्थित करतात. मात्र, मोदींचे बडोद्यावर प्रचंड गारूड आहे. महापालिका शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष असलेले जोशी यांना ही मोठी संधी मानली जाते. त्यांनी आपली छाप सोडली तर गुजरातच्या राजकारणात ते भविष्यात एक चेहरा बनू शकतात, असे येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अमित ढोलकिया यांनी सांगितले.
बेहरामपूरमध्ये यंदा ‘खेला होबे’? अधीर रंजन चौधरी अन् युसूफ पठाण यांच्यात चुरशीची लढत
बडोदा विकासापासून वंचित

सुरत, अहमदाबाद, गांधीनगरच्या तुलनेत बडोद्याचा विकास झालेला नाही. हजारो लोकांना रोजगार मिळू शकेल, असा उद्योग येथे आलेले नाहीत. गेल्या १५-२० वर्षांत मोठ्या पायाभूत सुविधा होऊ शकलेल्या नाहीत. शहरी प्रशासनाचा अभाव असून शिक्षणाचं पतन झाले आहे. एके काळी महाराजा सयाजीराव विद्यापीठ (एमएस विद्यापीठ) एकेकाळी देशातली महत्त्वाची संस्था होती. मात्र, विद्यापीठात पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची भरती होत नाही. संपूर्ण यंत्रणा कंत्राटी पद्धतीवर सुरू आहे. औद्योगिक, शैक्षणिक आणि शहरी विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत विद्यापीठातील प्राध्यापकांनी व्यक्त केले.

आमनेसामने

डॉ. हेमांग जोशी (भाजप), जशपालसिंह पढियार (काँग्रेस) यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी सात उमेदवार अपक्ष आहेत. जातीय समीकरणे मोदींच्या नावापुढे गौण आहेत. हेमांग हे गुजराती ब्राह्मण आहेत. यापूर्वी रंजनबेन भट्टही ब्राह्मण समुदायातीलच होत्या. त्यांच्या जागी जोशींना उमेदवारी मिळाली आहे.

Source link

bjp vs congresshemang joshijashpal singh padiyarlok sabha elections 2024maratha samaj
Comments (0)
Add Comment